विरेंद्र सेहवागला स्पष्ट आणि उघडपणे बोलण्यासाठी ओळखला जातो. आयपीएल २०२० च्या पहिल्या सामन्यानंतरही त्याने अशी वादग्रस्त वक्तव्य करायला सुरुवात केली आहे. चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवल्यानंतर सेहवागने धोनीबद्दल मोठे विधान केले.
सेहवाग म्हणाला की, “धोनी आणि केदार जाधवसारखे फलंदाज खेळपट्टीवर उतरताच लांब षटकार मारू शकत नाहीत, त्यामुळे मुंबई इंडियन्स विरूद्ध सॅम करनला लवकर मैदानात उतरवण्याचा निर्णय योग्य होता.”
सॅम करनचे कौतुक करीत क्रिकबझशी खास बातचीत करताना सेहवाग म्हणाला, “रायडूमुळे चेन्नई सहज जिंकली. दोन विकेट्स पडल्यानंतर इतर कोणत्याही फलंदाजाने जास्त वेळ घेतला असता. पंरतू रायडूने तसे केले नाही. धोनी म्हणाला असेल, ‘माझे करण-अर्जुन येतील’ आणि ते आले.”
करण अर्जूनमधील करण हा सॅम करन आणि अर्जुन हा अंबाती रायुडू झाला होता. दोघांनी मिळून धोनीला वाचवले. महत्त्वपूर्ण प्रसंगी सॅम करनने १८ धावा केल्या. त्यावेळी एमएस धोनी किंवा केदार जाधव फलंदाजीस आले असते तर ते अवघड झाले असते. ते येताच षटकार सहज मारू शकत नाहीत. तसेच डुप्लेसी आणि रायडूच्या भागीदारीमुळे सामना चेन्नईच्या पारड्यात टाकला.
मुंबई इंडियन्सविरूद्ध जडेजा बाद झाल्यानंतर एमएस धोनीने करनला फलंदाजीसाठी पाठवले. त्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या या निर्णयावर टीका होऊ लागली. परंतू, धोनीच्या या रणनीतीने काम केले. करनने ६ चेंडूत १८ धावा फटकावल्या. त्याने एक चौकार आणि दोन जबरदस्त षटकार ठोकले. येथूनच सामन्यात चेन्नईचा विजय निश्चित झाला होता.
सामन्यानंतर धोनीने करनला पाठवण्याचे कारणही स्पष्ट केले. तो म्हणाला, “जडेजा आणि करन यांनी फलंदाजीच्या क्रमवारीत वरच्या क्रमांकावर खुलेपणाने फलंदाजी करावी अशी माझी इच्छा होती. त्यावेळी दोन फिरकीपटूची षटके बाकी होती. आम्हाला मुंबईवर मानसिक दबाव आणायचा होता. आमची फलंदाजी खूप लांब आहे. दोघांनी तिथे जावे आणि दबाव कमी करण्यासाठी काही मोठे शॉट्स खेळावेत अशी आमची इच्छा होती. त्यानंतर फलंदाजांना पुन्हा लक्ष्य गाठणे सोपे जाते.”