शनिवारी (२ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ मधील दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स व राजस्थान रॉयल्स असा रंगला. मोठ्या धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात राजस्थानने १९० धावांचे आव्हान सहजरीत्या पार करत प्ले ऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. राजस्थानच्या विजयाचा नायक युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल ठरला. त्याने आक्रमक अर्धशतक ठोकत, विजयाची पायाभरणी केली. त्याच वेळी त्याच्या या खेळीमुळे संघाचा कर्णधार संजू सॅमसन भलताच खूश दिसला. सामन्यानंतर त्याने यशस्वीच्या यशाचे रहस्य सांगितले.
यशस्वीचे तुफानी अर्धशतक
आयपीएल २०२१ च्या उत्तरार्धात सातत्याने छोट्या छोट्या खेळणाऱ्या यशस्वीने शनिवारी आपले पहिले अर्धशतक साजरे केले. त्याने सलामीला उतरताना एविन लुईससह चेन्नईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दोघांनी ५.२ षटकात राजस्थानला ७७ धावांची सलामी दिली. २० वर्षीय यशस्वीने २१ चेंडूत ५० धावा काढत राजस्थानच्या विजयाचा मार्ग सुकर केला.
कर्णधाराने केले कौतुक
यशस्वीच्या या खेळीचे संघाचा कर्णधार संजू सॅमसन याने कौतुक केले तसेच, त्याच्या या यशाचे रहस्य सांगितले. संजू म्हणाला,
“नाणेफेक जिंकणे आमच्या फायद्याचे ठरले. दुसऱ्या डावात खेळपट्टी फलंदाजीला पोषक होती. आम्ही पावर प्लेमध्ये खेळ आमच्या बाजूने केला होता. लुईस व यशस्वीने शानदार सुरुवात दिली. मी यशस्वीसाठी खूप खुश आहे. मला आशा आहे की तो यापुढेही असाच खेळत राहील. तसाही तो नेहमी खातच असतो.”
संजूने यावेळी दुसरा अर्धशतकवीर शिवम दुबे याचेही कौतुक केले. तसेच, चेन्नईचा शतकवीर ऋतुराज गायकवाड याच्यादेखील खेळीबद्दल त्याने गौरवोद्गार काढले
राजस्थानचा पाचवा विजय
अबुधाबी येथे झालेल्या सामन्यात चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने नाबाद शतक झळकावत व इतर फलंदाजांनी उपयुक्त योगदान देत चेन्नईची धावसंख्या १८९ पर्यंत नेली. प्रत्युत्तरात, एविन लुईस व यशस्वी जयस्वाल यांनी संघाला ७७ धावांची वेगवान सलामी दिली. त्यानंतर, चौथ्या क्रमांकावर उतरलेल्या शिवम दुबे याने नाबाद ६४ धावा बनवत संघाला विजय मिळवून दिला. राजस्थानला प्ले आॅफमध्ये जाण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकून इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागेल.