पुणे | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने आपला पहिला डाव ५ बाद ६०१ धावांवर घोषीत केला. दुसऱ्या दिवसाची काही षटके बाकी असताना मैदानावर फलंदाजी करत असलेल्या कर्णधार कोहलीने जडेजा बाद झाल्यावर लगेच डाव घोषीत केला.
जडेजा जेव्हा बाद झाला तेव्हा तो ९१ धावांवर खेळत होता तर विराट कोहली नाबाद २५४ धावांवर. यामुळे भारताच्या या कर्णधार कारकिर्दीत प्रथमच त्रिशतक करण्याची संधी होती. आजची राहिलेली षटके पहाता आणि विराट ज्या प्रकारे वेगवान खेळ करत होता, हे त्रिशतक नक्कीच अवघड नव्हते.
असे असले तरी धावफलकावर मोठ्या धावा दिसत होत्या तर दुसऱ्या बाजूला जडेजा ९१ धावांवर बाद झाला. यामुळे विराटने लगेच डाव घोषीत करुन संघाला प्राधान्य दिलेले दिसले. तो एकप्रकारे केवळ जडेजाच्या शतकी खेळीची वाट पहात होता. परंतु ते करण्यात त्याला अपयश आल्यावर विराटने वैयक्तिक विक्रमाचा विचार देखील केला नाही.
आजच्या दिवसातील १७ षटकांचा खेळ बाकी असून भारतीय गोलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीला भगदाड पाडण्याचा नक्कीच विचार करत असणार आहेत.