पाकिस्तान क्रिकेट वर्तुळात सध्या वादळ उभे राहिले आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याने संघ निवड पद्धतीवर टीका केली तर, माजी कर्णधार व अष्टपैलू शोएब मलिक याने पीसीबी नातेसंबंध जोपासते असे म्हटले आहे. आता यामध्ये आणखी एका माजी खेळाडूची भर पडली आहे. ज्याने सरळ पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात राजकारण होते व त्यामुळे आपण क्रिकेट सोडणार होतो, असे म्हटले आहे.
माजी कर्णधाराने केले आरोप
पाकिस्तानला २००९ मध्ये टी२० विश्वचषक जिंकून देणारा शाहिद आफ्रिदी याने नुकताच क्रिकेटमध्ये राजकारण होत असल्याचा आरोप केला. पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना आफ्रिदीने म्हटले, “पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात राजकारण होते. २००९ मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर शोएब मलिककडे नेतृत्व देण्यात आले होते. माझी कामगिरी देखील चांगली होती. मात्र ऑलराऊंडर सिस्टिममुळे मी क्रिकेट सोडण्याच्या विचारात होतो.”
मी माझा निर्णय बदलला
आफ्रिदीने या मुलाखतीत बोलताना पुढे म्हटले, “तो काळ कठीण होता. एका अनुभवी खेळाडूच्या सल्ल्याने मी माझा निर्णय बदलला. त्याने मला अत्यंत समजुतीने सर्व गोष्टी सांगितल्या. पुढे मी पुन्हा पाकिस्तानसाठी खेळलो आणि नेतृत्व देखील केले.”
शाहिद आफ्रिदीने २०१० मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पुढे त्याच नेतृत्वात पाकिस्तानने २०११ क्रिकेट विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. २०१५ क्रिकेट विश्वचषकानंतर त्याने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. आफ्रिदीने २०१८ मध्ये आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. आफ्रिदी अजूनही काही व्यावसायिक टी२० लीगमध्ये खेळताना दिसतो.
आफ्रिदीची क्रिकेट कारकीर्द
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज अष्टपैलूंपैकी एक असलेल्या आफ्रिदीने आपल्या कारकिर्दीत ३९८ वनडे व ९९ टी२० सामने खेळताना अनुक्रमे ८०६४ व १४१६ धावा बनविल्या आहेत. तसेच त्याच्या नावे वनडेमध्ये ३९५ तर टी२० मध्ये ९८ बळी जमा आहेत. त्याने आपल्या कारकिर्दीत केवळ २७ कसोटी सामने खेळले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्या’ चौघांच्या सागंण्यावरुन युवा कोहलीने अचानक धरले होते सचिनचे पाय, वाचा तो किस्सा