टी२० विश्वचषकातील सुपर १२ च्या ‘गट अ’ मध्ये, बांगलादेश आणि श्रीलंका संघ शारजाच्या मैदानावर आमनेसामने आले होते. या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने श्रीलंकेविरुद्धच्या टी -२० विश्वचषक सामन्यात इतिहास रचला आहे.
बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन टी -२० विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने पाकिस्तानचा माजी अष्टपैलू शाहिद आफ्रिदीला मागे टाकले आहे. आफ्रिदीने ३४ सामन्यात ३९ विकेट्स घेतल्या होत्या. आता शाकिबच्या नावावर २९ सामन्यांत ४१ बळी झाले आहेत. शाकिबने टी-२० विश्वचषकात तीन वेळा एका डावात चार विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.
श्रीलंकेचा लसिथ मलिंगा टी २० विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने ३१ सामन्यात ३८ विकेट घेतल्या. पाकिस्तानचा सईद अजमल ३६ विकेट घेत चौथ्यानावर विराजमान आहे तर अजंता मेंडिस ३५ विकेट पाचव्या स्थानावर आहे.
श्रीलंकेविरुद्ध शाकिबला फलंदाजीत फारशी कमाल दाखवला आली नाही. तो १० धावांवर त्रिफळाचीत झाला. मात्र, १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या श्रीलंकेविरुद्ध त्याने गोलंदाजी करताना २ विकेट्स घेतल्या. मात्र, श्रीलंकेच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी करत हा सामना जिंकला.
माजी विश्वविजेता श्रीलंका संघाची टी२० विश्वचषकात चांगली कामगिरी सुरूच आहे. संघाने सुपर-१२ मधील पहिल्या सामन्यात बांगलादेशचा ५ विकेट्सने पराभव केला. सामन्यात प्रथम खेळताना बांगलादेशने ४ गडी गमावत १७१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने १८.५ षटकांत ५ गडी राखून लक्ष्य गाठले. चरित अस्लंका ८० धावांवर नाबाद राहिला. भानुका राजपक्षेनेही ५३ धावा केल्या.
श्रीलंकेचा या स्पर्धेतील हा सलग चौथा विजय आहे. यापूर्वी या संघाने पात्रता फेरीतील तीनही सामने जिंकले होते. श्रीलंकेने २०१४ मध्ये टी -२० विश्वचषक जिंकला. टी२० विश्वचषकातील बांगलादेशवर श्रीलंकेचा हा दुसरा विजय आहे. याआधी २००७ मध्ये संघाने बांगलादेशचा ६४ धावांनी पराभव केला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तानविरुद्ध भारतीय सलामीवीरांची साफ निराशा, आयसीसी स्पर्धेत तिसऱ्यांदाच घडली ‘अशी’ गोष्ट
विराटचं अर्धशतक ठरलं विश्वविक्रमी! ‘युनिवर्स बॉस’ ख्रिस गेललाही टाकले मागे
IND vs PAK: पाकिस्तानचा ऐतिहासिक विजय; विश्वचषकात पहिल्यांदाच भारतावर केली मात