पुढील महिन्यात होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात अनेक महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. या मालिकेसाठी पुन्हा एकदा भारताचा द्वितीय दर्जाचा संघ खेळवला जाऊ शकतो. बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार, पुन्हा एकदा अनुभवी सलामीवीर शिखर धवन भारतीय संघाचे नेतृत्व करेल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 6 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर या कालावधीत 3 सामन्यांची वनडे मालिका होणार असून, धवन पुन्हा संघाचा कर्णधार असेल. अगदी विश्वचषकाच्या तोंडावर ही मालिका खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. मागील वर्षी ही मालिका होणार होती. मात्र, त्यावेळी कोविडमूळे ही मालिका खेळवण्यात आली नव्हती. आता त्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी ही मालिका खेळली जाईल. विश्वचषकासाठी निवड झालेले खेळाडू या मालिकेत खेळताना दिसण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, “टी20 विश्वचषकाआधी अशी मालिका खेळवणे योग्य नाही. मात्र, कधीतरी अशी वेळ येते. विश्वचषकासाठी निवडलेल्या संघातील कोणाचा या मालिकेसाठी विचार होणार नाही. त्या खेळाडूंना विश्रांतीची गरज असेल. त्यामुळे शिखर संघाचे नेतृत्व करेल.”
शिखर धवन हा सध्या भारताच्या टी20 संघाचा भाग नाही. मात्र, वनडे क्रिकेटमध्ये त्याने आपली जागा पुन्हा मिळवली आहे.
धवनने गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या प्रसंगी भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. गेल्या वर्षी श्रीलंका दौऱ्यात तो वनडे आणि टी20 संघांचा कर्णधार होता. त्यानंतर जुलैमध्ये त्याने वेस्ट इंडिज दौऱ्यावर वनडे मालिकेत नेतृत्व सांभाळलेले. ऑगस्टमध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावरही त्याला कर्णधार बनवण्यात आले होते. मात्र, केएल राहुलचा संघात समावेश केल्यानंतर धवनला संघाचे नेतृत्व सोडावे लागले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Asia Cup 2022 Final: पाकिस्तानने टॉस जिंकून अर्धा सामना घातला खिशात! पाहा दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
“विलियम्सनला कर्णधार म्हणून हटविण्याची वेळ आली”; न्यूझीलंडच्याच दिग्गजाने व्यक्त केले रोखठोक मत