भारतीय क्रिकेट संघ एका नव्या बदलातून जात आहे. टी२० क्रिकेट पाठोपाठ कसोटी क्रिकेटमध्ये देखील मोठे बदल घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आगामी काळात भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळू शकतात. प्रशिक्षकपदावरून रवी शास्त्री गेल्याने टी-२०, वनडे आणि कसोटी खेळाडूंच्या भूमिका बदलतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. रोहित शर्मा टी-२० संघाचा कर्णधार झाला आहे. तो लवकरच एकदिवसीय सामन्यांची जबाबदारी स्वीकारणार असल्याचीही चर्चा आहे. याशिवाय कसोटी संघाच्या रचनेतही बदल होऊ शकतो. यात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या भवितव्याचा देखील निर्णय होण्याची शक्यता आहे.
भारतीय कसोटी संघाच्या मधल्या फळीसाठी नवे चेहरे आजमावण्याचे काम होऊ शकते. मायदेशात होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, अशी माध्यमांमध्ये चर्चा आहे. या मालिकेतील कामगिरी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघाची भूमिका तयार करेल.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी भारताने आपला अ संघ दौऱ्यावर पाठवला आहे. यात दुसऱ्या फळीतील जवळपास सर्वच खेळाडूंचा समावेश आहे. निवडकर्त्यांनी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराच्या भवितव्याबाबत निर्णय घेतल्याचे समजते. हे दोन्ही खेळाडू अलीकडच्या काळात चांगल्या फॉर्मसाठी झगडताना दिसत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी सातत्यपूर्ण धावा केलेल्या नाही. आगामी मालिकेत भारतीय संघाच्या मधल्या फळीत बदल होऊ शकतो, असे मानले जात आहे.
शुबमन गिलला सलामीऐवजी मधल्या फळीत फलंदाजी करण्यास सांगितले जाऊ शकते. त्याचबरोबर रोहित शर्माला कसोटी संघाचा उपकर्णधार बनवले जाऊ शकते. सलामीवीर बनल्यानंतर त्याच्या खेळात कमालीची सुधारणा झाली आहे. इंग्लंड दौऱ्यावरही त्याने शतक झळकावले होते. याशिवाय मयंक अगरवालचा पर्यायही मधल्या फळीसाठी आहे. संघासोबत हनुमा विहारीही आहे आणि तोही तळाला फलंदाजी करतो.
तथापि, मयंक आणि हनुमा या दोघांनाही अलीकडच्या काळात कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकलेले नव्हते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारत ‘अ’ संघात बीसीसीआयने प्रियांक पांचाळ, सरफराज खान, बाबा अपराजित या मधल्या फळीतील फलंदाजांना ठेवले आहे. आगामी काळात या खेळाडूंना भारतीय संघाच्या निवडीत प्राधान्य मिळू शकते.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारताला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तीन कसोटी, श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी आणि इंग्लंडमध्ये एक कसोटी खेळायची आहे. नंतर, जर भारतीय संघाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका असेल, तर संघाला बांगलादेशविरुद्धही कसोटी खेळावी लागेल. या सर्व मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
प्लेसिसचे होणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन? प्रशिक्षकांनी दिले संकेत
मास्टर ब्लास्टरचा ट्विटरवरही बोलबाला! जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये झाला समावेश
नव्या टी२० क्रमवारीत विराटची झाली घसरण; तर राहुल पोहोचला ‘या’ स्थानी






