संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकातील साखळी फेरीचे सामने समाप्त झाले असून, बुधवारी (१० ऑक्टोबर) उपांत्य फेरीच्या सामन्यांना सुरुवात होईल. तत्पूर्वी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नव्या टी२० क्रमवारीची घोषणा केली असून, यामध्ये भारतीय खेळाडूंना नुकसान सहन करावे लागले आहे. केवळ केएल राहुल हाच या क्रमवारीत प्रभाव टाकू शकला.
विराटला झाले नुकसान
गेल्या अनेक काळापासून तिन्ही प्रकारच्या क्रिकेटच्या क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये असणारा भारतीय कर्णधार विराट कोहली याला या क्रमवारीत चार स्थानांचे नुकसान झाले. तो आता आठव्या क्रमांकावर घसरला आहे. विराटने या विश्वचषकात केवळ तीन सामन्यांमध्ये फलंदाजी केली. यामध्ये तो ६८ धावा करू शकला. त्याच्या नावे ६९८ गुण जमा आहेत.
राहुलला झाला फायदा
आयपीएलपासून तुफान फॉर्मात असलेला भारतीय सलामीवीर केएल राहुल याला या क्रमवारीत फायदा झाला. तो तीन स्थानांच्या प्रगतीसह आठव्या क्रमांकावरून पहिल्या पाच फलंदाजांत पोहोचला. त्याच्या नावे ७२७ रेटिंग गुण जमा आहेत. राहुलने या विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक १९४ धावा काढल्या होत्या. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश होता.
बाबर पहिल्या स्थानी कायम
विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी करणार्या फलंदाजांना या क्रमवारीत फायदा झाला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने आपले पहिले स्थान कायम राखले. इंग्लंडचा जोस बटलर व दक्षिण आफ्रिकेचा रॅसी वॅन डर डसेन यांनी प्रगती करत टॉप टेनमध्ये जागा पटकावली. ते अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर पोहोचले. इंग्लंडचा डेव्हिड मलान दुसऱ्या, दक्षिण आफ्रिकेचा एडेन मार्करम तिसऱ्या व ऍरॉन फिंच चौथ्या क्रमांकावर आहे.






