टीम इंडियाचा कसोटी आणि वनडे कर्णधार शुबमन गिलने (Shubman gill) न्यूझीलंडविरुद्धची मालिका संपल्यानंतर विश्रांती न घेण्याचा निर्णय घेतला आहे. तो पंजाबकडून खेळण्यासाठी सज्ज झाला असून, गुरुवारपासून राजकोटमध्ये सौराष्ट्रविरुद्ध सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी सामन्यात तो मैदानात उतरेल.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिन्ही सामने गिल खेळला होता. तो भारताच्या टी-20 विश्वचषक संघाचा भाग नसल्यामुळे, त्याने विश्रांती घेण्याऐवजी लगेच लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये म्हणजेच कसोटी प्रकारात परतण्याचा पर्याय निवडला आहे.
26 वर्षीय शुबमन गिलचे लक्ष पंजाबला रणजी ट्रॉफीच्या बाद फेरीत (नॉकआउट) पोहोचवण्यावर असेल. पंजाब टीमच्या एका जवळच्या सूत्राने पीटीआयला (PTI) सांगितले की, शुबमनने वनडे मालिकेनंतर विश्रांती न घेण्याचा निर्णय घेतला आहे. इंदोरहून राजकोटला पोहोचण्यासाठी त्याला आठ तास लागले, कारण तिथून थेट विमान सेवा उपलब्ध नव्हती.
पंजाब सध्या ‘ग्रुप बी’ मध्ये पाच सामन्यांनंतर 11 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. पुढील फेरीत प्रवेश करण्यासाठी त्यांना उर्वरित तिन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे. गिलच्या पुनरागमनामुळे पंजाबच्या फलंदाजीला मोठी ताकद मिळाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकाता येथे झालेल्या पहिल्या कसोटीत जखमी झाल्यानंतर गिल पहिल्यांदाच कसोटी स्वरूपाच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे.






