भारतात सध्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे अनेक राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची परिस्थिती उद्भवली आहे. महाराष्ट्रातही १ जूनपर्यंत कडल लॉकडाऊन करण्यात आले आहे. असे असतानाच भारतीय संघाचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ लॉकडाऊनच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी चर्चेत आला.
नक्की झाले काय?
सध्या आयपीएल २०२१ स्पर्धा २९ सामन्यांनंतर कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. त्यानंतर भारतीय खेळाडू आपापल्या घरी परतले. यादरम्यान, पृथ्वी शॉ कोल्हापूरमार्गे गोव्याच्या दिशेने बुधवारी निघाला होता. मात्र, यावेळी त्याने एक चूक केली. प्रवासाला निघण्यापूर्वी त्याने ई-पास काढला नव्हता. त्यामुळे त्याला आंबोलीमध्ये सिंधुदूर्ग पोलिसांनी अडवले. त्यावेळी त्याच्याकडे ई-पासची विचारणा पोलिसांनी करताच शॉची त्रेधातिरपीट उडाली.
तसेच त्याच्याकडे ई-पास नसल्याने पोलिसांनी आपले कर्तव्य बजावत त्याला तासभर थांबवून ठेवले. अखेर शॉने ई-पाससाठी ऑनलाईन अर्ज केला आणि ई-पास आल्यानंतर तो त्याने पोलिसांना दाखवत पुढे मार्गक्रमण केले. शॉसारख्या एखाद्या स्टार क्रिकेटपटूला थांबवून ठेवल्याबद्दल पोलिसांच्या प्रमाणिकपणाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. दरम्यान, शॉ मित्रांसह गोव्याला जात असल्याचे समजत आहे.
शॉ आहे जबरदस्त फॉर्ममध्ये
शॉ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने नुकत्याच स्थगित झालेल्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून ८ सामन्यात ३८ च्या सरासरीने ३०८ धावा केल्या होत्या. यात ८२ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली आहे. त्याचबरोबर त्याने यावर्षीची विजय हजारे ट्रॉफीदेखील गाजवली. या स्पर्धेत त्याने ८ सामन्यांत तब्बल १६५.४० च्या सरासरीने ८२७ धावा वसूल केल्या.
इंग्लंड दौऱ्यासाठी संधी नाही
तरी, शॉला अगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात निवडण्यात आले नाही. तो भारताकडून शेवटचा कसोटी सामना मागीलवर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळला होता. मात्र, त्यानंतर त्याच्या खराब कामगिरीमुळे त्याला भारताच्या कसोटी संघातून दूर करण्यात आले. असे असले तरी, शॉचा मर्यादीत षटकांतील फॉर्म पाहाता त्याला जुलैमध्ये होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यातील मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी भारतीय संघात स्थान दिले जाण्याची दाट शक्यता आहे.
शॉ यापूर्वीही अडकला आहे वादात
साल २०१९मध्ये शॉवर बीसीसीआयने डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ८ महिन्यांची बंदी घातली होती. त्याला बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटल्याप्रमाणे अनवधानाने प्रतिबंधित पदार्थ घेतल्याने या बंदीला सामोरे जावे लागले होते. त्याची ही ८ महिन्यांच्या बंदीचा कालावधी १५ नोव्हेंबर २०१९ ला संपला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
‘असे’ झाले तर पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमिर खेळणार आयपीएल? वाचा सविस्तर
“मोठ्या दुःखाने सांगावे लागत आहे की…”, आरपी सिंगने वडीलांच्या निधनानंतर लिहिला भावूक संदेश
ईद मुबारक! भारतीय कर्णधार विराट कोहलीने ‘या’ संदेशासह देशवासीयांना दिल्या ईदच्या शुभेच्छा




