तब्बल ७ वर्षांनंतर भारतीय महिला क्रिकेटपटू कसोटी सामन्याच्या लढतीसाठी मैदानावर उतरल्या होत्या. ब्रिस्टल येथे १६ ते १९ जून दरम्यान इंग्लंड विरुद्ध भारत असा हा एकमेव कसोटी सामना रंगला होता. या सामन्यातील पहिल्या डावात यजमानांनी ३९७ धावा फलकावर नोंदवत सामन्यावर मजबूत पकड बनवली. परंतु पाहुणा संघही हार न मारता सामना अनिर्णीत ठेवण्यात यशस्वी राहिला. हा सामना अनिर्णीत राखण्यात युवा भारतीय क्रिकेटपटू स्नेह राणा हिने महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान तिने मोठा विश्वविक्रमही केला आहे.
इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण करत २७ वर्षीय स्नेह राणाने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीतही चमकदार कामगिरी केली आहे. ती पदार्पणाच्या कसोटीत ४ विकेट्स आणि ५० पेक्षा जास्त धावा करणारी पहिलीच भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तर जगभरातील चौथी महिला क्रिकेटपटू बनली आहे.
फिरकी गोलंदाज स्नेह राणाने इंग्लंडच्या पहिल्या डावात ३९.२ षटके गोलंदाजी करताना तब्बल ४ विकेट्स घेतल्या. दरम्यान चार षटकेही तिने निर्धाव टाकली. याव्यतिरिक्त पहिल्या डावात २३१ धावा केल्यानंतर इंग्लंडने भारताला फॉलोऑन दिला. यावेळी आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत तिने नाबाद ८० धावा करत सामना अनिर्णीत राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १५४ चेंडूंचा सामना करताना १३ चौकारांच्या मदतीने ही धावसंख्या केली. यासह पदार्पणाच्या कसोटीत ४ विकेट्स आणि धावांची पन्नाशी पार करण्याचा शानदार विक्रम तिच्या खात्यात जमा झाला आहे.
याबरोबरच स्नेह राणाने संघ सहकारी तानिया भाटियासोबत नवव्या विकेटसाठी १०४ धावांची दमदार भागिदारीही केली. यष्टीरक्षक फलंदाज तानिया भाटियाने दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत ८८ चेंडूत नाबाद ४४ धावा केल्या. दरम्यान तिने ६ चौकारही मारले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘विनोदी पंचगिरी’; किवींनी नकार देऊनही पंचांची थर्ड अंपायरकडे धाव, सेहवागने साधला निशाणा
अन् थोडक्यात वाचला पुजारा, वॅग्नरने टाकलेला चेंडू आदळला हेल्मेटवर; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा क्षण
आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यांत खेळताना विराटचा ‘मोठा’ विक्रम; गंभीर, गांगुलीला टाकलं मागे