भारतीय क्रिकेट संघाच्या सध्याच्या कामगिरीचे वर्णन दिग्गजाने खूप उत्तम केले आहे. भारतीय फलंदाजी इतकी मजबूत आहे की विरोधी संघांनी त्यांना प्रथम फलंदाजी करण्यास सांगणे म्हणजे स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे आहे. नुकतेच झालेल्या आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्याची आठवण करून देताना सौरव गांगुलीने मस्करीने म्हटले की सामना सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासातच न्यूझीलंड पराभूत झाला होता.
गांगुलीच्या मते, सध्याची भारतीय गोलंदाजी आणि फलंदाजी इतकी संतुलित आहे की जगातील काही संघच त्याची बरोबरी करू शकत आहेत. गांगुलीने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचेही कौतुक करताना म्हटले की गेल्या वर्षभरात संघाचे यश हे त्याच्या रणनीतीचे परिणाम आहेत.
अंतिम सामन्यातील न्यूझीलंडच्या पराभवाबाबत गांगुली म्हणाले, “न्यूझीलंडने संध्याकाळी ७.३० वाजताच विश्वचषक गमावला होता. सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू झाला आणि पहिल्या अर्ध्या तासातच सर्व स्पष्ट झाले होते. माझ्यासोबत जे सामना पाहत होते, त्यांनाही मी हेच सांगितले होते.”
भारतीय फलंदाजीच्या मजबूतीबाबत बोलताना गांगुली म्हणाले, “ईशान किशन, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि तिलक वर्मा यांच्यासारख्या खेळाडूंसह भारताला प्रथम फलंदाजी करण्यास सांगणे हा निर्णय कोणत्याही संघासाठी धोकादायक असू शकतो. नंतर संघाकडे जसप्रीत बुमराह आहे. “
भारतीय संघ सध्या सर्वोत्तम संघ आहे. गांगुलीने संघाच्या मर्यादित षटकांतील क्रिकेटमध्ये लक्ष वेधले आणि संघात असे अनेक उत्तम खेळाडू असून भारत दोन संघ मैदानात उतरवू शकतो, इतकी त्याची प्रतिभा आहे, असे वक्तव्य केले आहे.
त्याबाबत गांगुली यांनी पुढे म्हटले, “संघात नसलेल्या खेळाडूंचा विचार करा. श्रेयस अय्यर मर्यादित षटकांचा उत्तम खेळाडू आहे, तरीही त्याला संघात स्थान मिळत नाही. वैभव सूर्यवंशी कोणत्याही संघात खेळू शकतो. गिल बाहेर बसला आहे. त्यामुळे तुम्ही सहजतेने दोन उत्तम संघ मैदानात उतरवू शकता.”
भारताला केवळ ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका टक्कर देऊ शकते, असेही गांगुली यांनी पुढे म्हटले आहे.
आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ चा सामना ८ मार्चला अहमदाबादमध्ये खेळला गेला. यामध्ये भारताने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी केली होती. संजू सॅमसनच्या ८९ धावा , ईशान किशन आणि अभिषेक शर्मा यांचे अर्धशतक यामुळे भारताने २० षटकात ५ विकेट्स गमावत २५५ धावसंख्या उभारली होती. हा सामना भारताने ९६ धावांनी जिंकला आणि सलग दुसऱ्यांदा टी२० विश्वचषक उंचावला. तसेच बुमराहने ४ षटकात १५ धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या.






