भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. मागील वर्षी विश्रांती घेतल्यानंतर आशिया चषकापासून त्याची बॅट चांगलीच बोलतेय. टी20 विश्वचषकात तो सर्वात यशस्वी फलंदाज राहिला. त्यानंतर बांगलादेश व श्रीलंकेविरुद्ध त्याने लागोपाठ शतके झळकावलेली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेआधी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने विराटच्या कसोटी फॉर्मविषयी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
विराटने पुनरागमन केल्यानंतर तीन वनडे शतके पूर्ण केली आहेत. मात्र, बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेत तो फारसा यशस्वी ठरला नव्हता. त्यानंतर त्याच्यासमोर आता सर्वात मोठी परीक्षा ऑस्ट्रेलियाची असेल. भारत ही मालिका जिंकून सलग दुसऱ्यांदा आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जागा बनवण्यास उत्सुक असणार आहे. त्यामुळे या मालिकेत विराटची भूमिका महत्त्वाची असेल, असे गांगुली याने म्हटले.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना गांगुली म्हणाला,
“त्याचा फॉर्म चांगला सुरू आहे. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये त्याला हा फॉर्म आणखी उंचवावा लागेल. कारण, कसोटी मध्ये संघ त्याच्यावर अधिक अवलंबून असतो. ऑस्ट्रेलिया एक दर्जेदार संघ आहे. त्यामुळे या संघाविरुद्ध चांगली कामगिरी करण्याचा दबाव ही खेळाडूंवर असतो. ही एक काट्याची मालिका होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया याच संघांना जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पाहायला मजा येईल.”
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही चार सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 9 फेब्रुवारीपासून खेळली जाईल. मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे खेळला जाणार आहे. या मालिकेत विजय मिळवून भारतीय संघाला कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी जाण्याची तसेच, कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी असेल.
(Sourav Ganguly Statement Ok Virat Kohli Test Form Before Border-Gavaskar Trophy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष : क्रिकेटचा हॅरी पॉटर अर्थात न्यूझीलंडचा फिरकीपटू ‘डॅनियल व्हेट्टोरी’; जाणून घ्या त्याचे खास विक्रम
कारकिर्दीतील शेवटचे ग्रँडस्लॅम नाही जिंकू शकली सानिया मिर्झा, पराभवानंतर अश्रू अनावर