जोहान्सबर्ग। भारतीय महिला संघाने तिसऱ्या टी २० सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी १३४ धावांचे आव्हान ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेकडून आज शबनीम इस्माइलने ३० धावात ५ विकेट्स घेत शानदार कामगिरी केली.
आज दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला त्यांच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवत मागील दोन सामन्यात फॉर्म मध्ये असणाऱ्या भारतीय फलंदाजीला आज १७.५ षटकातच १३३ धावांवर सर्वबाद केले.
भारताकडून आज स्म्रिती मानधना आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने चांगली लढत दिली. पहिल्या दोन सामन्यात शानदार अर्धशतकी खेळी करणारी मिताली राज आज शून्य धावेवर बाद झाली. त्यामुळे मानधना आणि हरमनप्रीतवरची जबाबदारी वाढली होती. या दोघींनीही ती जबाबदारी सांभाळताना ५५ धावांची अर्धशतकी भागीदारी रचली.
पण मानधनाला २४ चेंडूत ३७ धावांवर असताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार डेन व्हॅन निएकर्कने बाद करत या दोघींची जोडी तोडली. त्यानंतर जेमिमा रोड्रिगेजने(६) हरमनप्रीतला साथ देण्याचा प्रयत्न केला. पण हरमनप्रीत ३० चेंडूत २ षटकार आणि ६ चौकारांच्या साहाय्याने ३० चेंडूत ४८ धावा करून बाद झाली. तिला इस्माइलने बाद केले.
त्यानंतर वेदा कृष्णमूर्थी(२३) व्यतिरिक्त बाकी फलंदाजांना खास काही करता आले नाही. बाकी फलंदाजांपैकी अनुजा पाटील(७), शिखा पांडे(३), तानिया भाटिया(१), पूजा वस्त्रकार(२), पूनम यादव(३), राजेश्वरी गायकवाड (१*) यांनी धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेकडून शबनीम इस्माइल (५/३०) मसाबाता क्लास(२/२०), मॅरिझन कॅप(१/६), मोसेलीन डॅनिएल्स(१/२३) आणि डेन व्हॅन निएकर्क(१/१६) यांनी विकेट्स घेतल्या.






