जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका महिला संघाने आज भारतीय महिला संघाविरुद्ध ५ विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच दक्षिण आफ्रिकेने ५ सामन्यांच्या टी २० मालिकेत आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. या मालिकेत २-१ ने भारतीय संघ आघाडीवर आहे.
भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी १३४ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचे पाठलाग करताना सून लूसने ४१ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तिला क्लो ट्रायऑनने चांगली साथ दिली.
भारताने सलामीवीर लिझेल लीला(५) लवकर बाद करत सुरुवात चांगली केली होती. पण नंतर नियमित वेळाने भारताला विकेट्स घेण्यात अपयश आले. त्याचा दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी फायदा घेत आक्रमक खेळ करून १९ षटकातच १३५ धावांचे आव्हान पूर्ण केले.
अखेरच्या काही षटकात ट्रायऑनने चांगली फटाकेबाजी केली होती. तिने १५ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकरांच्या साहाय्याने ३४ धावांची स्फोटक खेळी केली. दक्षिण आफ्रिकेच्या बाकी फलंदाजांनीही विजयात चांगला सहभाग नोंदवला. बाकी फलंदाजांपैकी डेन व्हॅन निएकर्क(२६), मिग्नॉन द्यू प्रीझ(२०), नादिन डे क्लर्क(५*), आणि मॅरिझन कॅप(२*) यांनी धावा केल्या.
भारताकडून अनुजा पाटील(१/४४), पूनम यादव(१/१९), पूजा वस्त्रकार(२/२१) आणि राजेश्वरी गायकवाड(१/२०) यांनी विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेची गोलंदाज शबनीम इस्माइलने ३० धावात ५ विकेट्स घेतले. या जोरावर दक्षिण आफ्रिकेने भारताचा डाव १७.५ षटकात १३३ धावांवर संपुष्ठात आणण्यात यश मिळवले.
भारताने मागच्या दोन्ही सामन्यात अर्धशतकी खेळी करणारी मिताली राजची विकेट आज शून्य धावेवरच गमावली. त्यानंतर भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्म्रिती मानधना यांनी चांगली लढत दिली होती. पण या दोघी बाद झाल्यानंतर वेदा कृष्णमूर्थी व्यतिरिक्त अन्य फलंदाजांना विशेष काही करता आले नाही.
हरमनप्रीतने आज ३० चेंडूत ४८ धावांची तर मानधनाने २४ चेंडूत ३७ धावांची आक्रमक खेळी केली. तसेच वेदाने १४ चेंडूत २३ धावा केल्या. भारताकडून अन्य फलंदाजांपैकी जेमिमा रोड्रिगेजने(६), अनुजा पाटील(७), शिखा पांडे(३), तानिया भाटिया(१), पूजा वस्त्रकार(२), पूनम यादव(३), राजेश्वरी गायकवाड (१*) यांनी धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेकडून शबनीम इस्माइल (५/३०) मसाबाता क्लास(२/२०), मॅरिझन कॅप(१/६), मोसेलीन डॅनिएल्स(१/२३) आणि डेन व्हॅन निएकर्क(१/१६) यांनी विकेट्स घेतल्या आहेत.