सध्या भारतीय क्रिकेट संघाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बोलबाला आहे. तीनही विभागात भारतीय संघ वरचढ असलेला दिसतो. भारतीय फलंदाज तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर एकप्रकारे राज्य करत आहेत. मात्र, पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. भारतीय संघाने १९३४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यानंतर सीके नायडू, लाला अमरनाथ व विजय हजारे यांच्यासारखे काही मोजके फलंदाज भारतीय संघासाठी आपले योगदान देत. सुनील गावसकर यांचा क्रिकेट जगतात उदय होईपर्यंत भारतीय क्रिकेटमधील फलंदाजीतील बरेचसे विक्रम आणखी एका मुंबईकर खेळाडूच्याच नावे होते. त्यावेळी मुंबई आणि भारतीय संघाच्या फलंदाजीची धुरा सांभाळणारे हे फलंदाज होते पॉली उम्रीगर. भारतीय क्रिकेटमधील पहिले विक्रमादित्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उम्रीगर यांची आज जयंती.
सधन कुटुंबात झाला जन्म
उम्रीगर यांचे कुटुंबीय भारतातील सर्वात सधन समजल्या जाणाऱ्या पारशी समाजाचे. त्यांच्या वडिलांची सोलापूर येथे कापड गिरणी होती. त्यामुळे ते तिथेच स्थायिक असत. सोलापूर येथेच पॉली यांचा २८ मार्च १९२६ रोजी जन्म झाला. त्यांचे खरे नाव पहलान रतनजी उम्रीगर असे होते. परंतु, सर्वजण त्यांना ‘पॉली’ नावाने हाक मारत. पॉली हे शाळेत जाऊ लागल्याने व मुंबईत कापड गिरणींना मोठी बाजारपेठ असल्याने त्यांच्या वडिलांनी सोलापूर येथील मिल बंद करत मुंबईकडे प्रस्थान केले.
पॉली जसेजसे मोठे होऊ लागले तसेतसे त्यांना क्रिकेटची गोडी वाटू लागली. ते क्रिकेट व्यतिरिक्त हॉकी आणि फुटबॉलदेखील खेळत. मात्र क्रिकेटकडे त्यांचा कल जास्त होता. त्यावेळी मुंबईमध्ये समाजनिहाय चौरंगी क्रिकेटचे सामने खेळले जात. पारशी संघाचे त्यावेळी मुंबई क्रिकेटमध्ये वर्चस्व होते.
पॉली यांनी १९४४ मध्ये मुंबई येथे खेळल्या जाणाऱ्या चौरंगी स्पर्धेतून पारशी संघासाठी खेळताना वयाच्या अठराव्या वर्षी पदार्पण केले. मुंबईतील प्रसिद्ध सेंट झेवियर्स कॉलेजमधून त्यांनी विज्ञान शाखेची पदवी मिळवली. सोबतच ते कॉलेजच्या क्रिकेट संघाचे कर्णधारदेखील होते.
आंतरराष्ट्रीय कारकीर्द
सन १९४८ मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या सराव सामन्यात शतक झळकावून त्यांनी भारतीय संघाचा दरवाजा ठोठावला. त्यांना वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. पहिले चार सामने ते संघाचा नियमितपणे भाग राहिले. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी त्यांचा संघात समावेश होता. मात्र, त्यांना अंतिम अकरामध्ये सामील केले जाणार नव्हते. परंतु, हेमू अधिकारी अचानक दुखापतग्रस्त झाल्याने अखेरच्या क्षणी त्यांचा संघात समावेश करण्यात आला. त्या सामन्यात सातव्या स्थानावर फलंदाजी करत त्यांनी नाबाद १३० धावांची खेळी करत संघातील आपली जागा पक्की केली.
सन १९५२ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर सर ऍलेक बेडसर, फ्रेड ट्रूमन यांच्यासारख्या दर्जेदार गोलंदाजांचा त्यांनी सामना केला. पुढच्या वर्षी वेस्ट इंडीजच्या तुफानी गोलंदाजांचा सामना करत त्यांनी धावांचा डोंगर रचला. न्यूझीलंडविरुद्ध २२३ धावा करताना भारताकडून पहिले दुहेरी शतक ठोकण्याचा मान त्यांनी मिळविला.
कर्णधारपद आणि वाद
उम्रीगर यांनी १९५५-१९५६ मध्ये प्रथमत: सलग आठ सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले. १९५८ मध्ये गुलाम मोहम्मद अचानकपणे निवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडे पुन्हा एकदा कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. याच वेळी त्यांच्यासोबत एक वाद जोडला गेला. वेस्ट इंडिज विरुद्धच्या मद्रास कसोटीवेळी निवृत्त गुलाम मोहम्मद व जखमी विजय मांजरेकर यांच्या जागी एक अतिरिक्त फलंदाज म्हणून ते मनोहर हर्डीकर यांना खेळवू इच्छित होते. मात्र, त्यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष असलेल्या रतीभाई पटेल यांनी जसुभाई पटेल यांना खेळवण्याची गळ घातली. उम्रीगर यांनी सामन्याच्या आदल्या रात्री तडकाफडकी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. पुढे तीन वर्ष भारतासाठी खेळले. पण त्यांनी कधीही संघाचे नेतृत्व केले नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
भारतीय संघासाठी जवळपास १४ वर्ष खेळल्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यांनी ५९ सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले. जे त्यावेळी सर्वाधिक होते. पुढे, ते १९६७ पर्यंत मुंबईसाठी क्रिकेट खेळत राहिले. निवृत्तीनंतर त्यांनी भारतीय संघाचे व्यवस्थापक तसेच निवड समितीचे अध्यक्षपद भूषवले. बीसीसीआयने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटूला ‘पॉली उम्रीगर अवॉर्ड’ देण्यास सुरुवात केली.
तगडी शरीरयष्टी, विरोधीखेळाडूंच्या नजरेला नजर भिडवून खेळण्याची धमक व तंत्राचा योग्य मेळ घालत उम्रीगर यांनी आपली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगळी ओळख बनवली. अनेक जण त्यांना भारतीय क्रिकेटच्या दोन पिढ्यांमधील दुवा म्हणत. मर्चंट-हजारे युगामधून बाहेर येत भारतीय क्रिकेटला दिशा देण्याचे काम उम्रीगर यांनी केली, असे अनेक समीक्षक छातीठोकपणे सांगतात.
महत्त्वाच्या बातम्या –
पंजाब संघ ‘या’ बाबतीत खरंच आहे ‘किंग्स’, भल्याभल्या संघांना जे जमलं नाही; ते यांनी करून दाखवलंय