भारत आणि श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना शुक्रवारी (23 जुलै) कोलंबोच्या आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर खेळण्यात आला होता. श्रीलंकेच्या संघाने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर हा सामना 3 विकेट्सने जिंकला. मात्र, भारतीय संघाने 3 सामन्यांची ही मालिका २-१ ने आपल्या नावावर केली आहे. या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजयी झाल्यानंतर श्रीलंका संघाचा कर्णधार दसून शनाकाने भारतासाठी असे काही वक्तव्य केले, ज्यामुळे त्याने करोडो भारतीय चाहत्यांची मने जिंकली आहेत.
तिसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाने नाणेफेक जिंकले आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 43.1 षटकात फक्त 225 धावा करू शकला. या डावात भारतीय संघाकडून पृथ्वी शॉने सर्वाधिक 49 चेंडूमध्ये 49 धावा काढल्या त्याचबरोबर संजू सॅमसनने देखील 46 चेंडूमध्ये 46 धावा काढल्या. याला प्रत्युत्तर देत श्रीलंका संघाने 39 षटकांत 7 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडोने 98 चेंडूत 76 धावांची सर्वाधिक खेळी केली. त्याचवेळी भानुका राजपक्षेने देखील 56 चेंडूत 65 धावा केल्या.
मालिका जिंकल्यामुळे भारतीय संघाचे अभिनंदन
एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पराभव झाल्यानंतरही श्रीलंका संघाचा कर्णधार दसून शनाकाने भारतीय संघाचे अभिनंदन करत खेळाडूंचे कौतुकही केले. शनाका म्हणाला की, “मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघाचे अभिनंदन. ही पूर्ण मालिका खूपच चांगली होती. आम्ही ज्याप्रकारे खेळलो त्यासाठी आम्ही खरोखरच खुश आहोत. गोलंदाजांनी परिपक्वता दाखविली, हीच माझी युवा खेळाडूंकडून अपेक्षा केली होती. भविष्यातील प्रत्येक दौऱ्यामध्ये देखील आपला खेळ असाच सुरू ठेवेल अशी मी आशा करतो.”
“जर आपण बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता आणि सतत खेळत असाल, तर खेळाडू सुधारतात. चाहत्यांसाठी हा एक मोठा विजय आहे. आम्ही बर्याच दिवसांपासून वाट पाहत होतो आणि बर्याच दिवसांनी घरच्या मैदानावर भारतीय संघाविरुद्ध सामना जिंकलो. मला आमच्या सर्व खेळाडूंचे आणि सहाय्यक कर्मचार्यांचे आभार मानायचे आहेत. खरं तर मला संघाचे नेतृत्व करायला खूप मज्जा येते,” असेही तो पुढे बोलताना म्हणाला. (Sri Lanka captain Dasun Shanaka won the hearts of the fans after the match)
आता या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर भारतीय संघाला 3 टी 20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेचा पहिला सामना 25 जुलैला होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-विराटसेनेला दुखापतींनी घेरले; भारतीय दिग्गज म्हणाले, भुवीसह ‘या’ ३ खेळाडूंना इंग्लंडला पाठवा
-“आधी बाबर आजमला २०-३० हजार धावा करु द्या, मग त्याची तुलना विराट कोहलीशी करा”