श्रीलंकेचा माजी सलामीवीर फलंदाज सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) याला जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणले जाते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटले आहे की, “मी सर डॉन ब्रॅडमन यांना फलंदाजी करताना पाहिले नाही. पण, जयसूर्याला पाहिले आहे. मी माझ्या क्रिकेट कारकिर्दीत त्याच्यापेक्षा चांगला फलंदाज पाहिला नाही.” केवळ सचिनच नाही तर, ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅकग्रानेही जयसूर्याला सर्वात खतरनाक फलंदाज म्हटले आहे.
याच जयसूर्याच्या कारकिर्दीची सुरुवातीची काही वर्षे खूप वाईट होती. पण, त्याच्या आयुष्यात एक मोठी संधी आली आणि त्याने त्या संधीचे सोने केले.१९८८मध्ये १९ वर्षांखालील विश्वचषकातून श्रीलंकाचे प्रातिनिधित्व करत, जयसूर्याने अवघ्या एका वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थान मिळवले होते. त्यानंतर पाकिस्तान दौऱ्यावरील श्रीलंका ब संघात जयसूर्याची निवड झाली होती. यावेळी १९ वर्षांच्या जयसूर्याने लाहोर आणि कराची येथे पाकिस्तान ब विरुद्ध सलग २ द्विशतके ठोकली होती.
त्याच्या या कारनाम्याने त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणाची दारे खुली केली. डिसेंबर १९८९मध्ये मेलबर्न येथील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेतून जयसूर्याने पदार्पण केले. यावेळी ५व्या क्रमांकावर फलंदाजी करत तो केवळ ३ धावांवर बाद झाला. जयसूर्याच्या हा फॉर्म पुढे ४ वर्षे असाच राहिला. त्याला ३३ डावात एकही अर्धशतक ठोकता आले नव्हते. २८ ऑक्टोबर १९९३पर्यंत जयसूर्याने सर्वाधिक ३४ धावा केल्या होत्या.
मात्र, १९९४मध्ये पाकिस्तान संघ श्रीलंका दौऱ्यावर आला होता. यावेळी जयसूर्याला सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. ५ सामन्यांच्या वनडे मालिकेत जयसूर्याने पहिल्या ३ सामन्यात सलग अर्धशतकी खेळी केली होती. त्यानंतर १४ डावात त्याला एकही अर्धशतक करता आले नाही. पण, ८ डिसेंबर १९९४ला न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत, जयसूर्याने वनडे कारकिर्दीतील पहिले शतक केले होते. यावेळी दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत त्याने १४३ चेंडूत १४० धावा केल्या होत्या. वनडे पदार्पणाच्या ५ वर्षांनंतर जयसूर्याने पहिले वनडे शतक ठोकले होते.
जयसूर्याचे संघातील स्थान नेहमी बदलत राहिले. संघाच्या गरजेनुसार त्याला फलंदाजीला आणि गोलंदाजीला पाठवले जात असत. अखेर, १९९६ साली जयसूर्याच्या आयुष्यात असा एक टर्निंग पॉईंट आला ज्याने एका रात्रीत फक्त त्याची कारकिर्द नव्हे, तर पूर्ण वनडे क्रिकेटची रणनिती बदलून टाकली.
झाले असे की, १९९६मध्ये भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका संघ विश्वचषकाच्या तयारीत व्यस्त होते. यावेळी भारत आणि पाकिस्तानला विजयाचे दावेदार समझले जात होते. कारण, श्रीलंका संघ त्यावेळी जास्त मजबूत नव्हता. त्यांची विजयी टक्केवारी फक्त २९ टक्के होती. तर, अन्य संघ त्यांच्यापेक्षा जास्त प्रबळ होते.
परंतु, तत्कालिन श्रीलंका प्रशिक्षक डेव व्हॉटमोर यांनी संघाची पूर्ण रणनिती बदलली. सर्व संघ पहिल्या ४० षटकात हळूवार धावा करत असत आणि शेवटच्या १० षटकात फटकेबाजी करत मोठ्या धावा करत असत. पण व्हॉटमोर आणि संघाचा कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी याउलट रणनिती वापरली. त्यांनी पहिल्या १५ षटकात वेगाने धावा करायचे ठरवले आणि याची जबाबदारी जयसूर्या आणि रोमेश कालूवितरनावर सोपवली.
यावेळी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत जयसूर्या आणि कालूवितरनाने उल्लेखनीय खेळी केली. याचा परिणाम असा झाला की, श्रीलंकाने विश्वचषकातील एकही सामना गमावला नाही आणि शेवटी चषकावर आपले नाव कोरले. जयसूर्याने संपूर्ण विश्वचषकात २२१ धावा केल्या. तसेच ६ विकेट्स घेतल्या आणि ७ झेलही पकडले. त्याच्या या कामगिरीने त्याला मालिकावीर पुरस्कारही मिळाला.
श्रीलंका संघाच्या पावरप्लेमध्ये आक्रमक खेळी करण्याच्या रणनितीचा पुढे सर्व संघ स्विकार करू लागले.
विश्वचषकातील सलामीवीर फलंदाजाचे स्थान जयसूर्याने गमावले नाही. पुढे तो संघातील सलामीवीर फलंदाज ठरला. त्याने वनडेत एकूण ४४५ सामने खेळले आहेत. यापैकी ३८३ सामन्यात त्याने सलामीला फलंदाजी केली आहे आणि १२००० पेक्षाही जास्त धावा केल्या आहेत. एवढेच नव्हे तर, सलामीला फलंदाजी करत जयसूर्याने वनडेत २८ शतके केली आहेत.
सातव्या क्रमांकावर जयसूर्याची फलंदाजी सरासरी १६ इतकी होती. तर ६व्या क्रमांकावर १३, ५व्या क्रमांकावर ४.७१ आणि चौथ्या क्रमांकावर १४.६६च्या सरासरीने त्याने फलंदाजी केली आहे. यावरून स्पष्ट होते की, जयसूर्या हा सलामीला फलंदाजी करण्यासाठी बनला होता आणि त्याने हे सिद्ध करून दाखवले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोईन अलीने टाकली बीसीसीआयसमोर फिरकी! म्हणाला ‘भारताचे नेतृत्व पुन्हा विराट कोहलीकडे द्यायला हवे’
रोहित पाचवी कसोटी नक्की खेळणार का नाही? थेट प्रशिक्षक राहुल द्रविडने केले स्पष्ट
टी२० कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळीनंतरही भरले नाही संजूचे मन; म्हणाला, ‘माझ्याकडे संधी होती, पण…’