भारत विरुद्ध पाकिस्तान पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आज झालेल्या १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताने पाकिस्तानचा २०३ धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. आता भारताचा सामना ३ फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया संघाशी होणार आहे.
भारताने सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे. त्यामुळे पृथ्वी शॉच्या टीम इंडियापेक्षा ऑस्ट्रेलिया संघावर अंतिम फेरीत जास्त दबाव असणार आहे.
या सामन्यात भारताच्या खेळाडूंनी एक संघ म्हणून आणि एक खेळाडू म्हणूनही अनेक विक्रम केले. ते असे
१.
भारताने विक्रमी ६व्यांदा १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात अंतिम फेरी गाठली आहे. केवळ पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघाने ५वेळा अशी कामगिरी केली आहे.
२.
भारतीय संघाने २०००, २००६, २००८, २०१२, २०१६ आणि २०१८ या वर्षांत १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे.
३.
आज पाकिस्तान ६९ धावांवर सर्वबाद झाले. ही त्यांची युवकांच्या क्रिकेटमधील पाकिस्तानची तिसरी नीचांकी धावसंख्या होती.
४.
आज पाकिस्तान २०३ धावांनी पराभूत झाले. युवकांच्या क्रिकेटमधील हा त्यांचा सर्वात मोठा पराभव आहे. यापूर्वी ते २०१७मध्ये अफगाणिस्तानकडून १८५ धावांनी पराभूत झाले होते.
५.
युवकांच्या क्रिकेटमध्ये शुभमन गिलने ४थ्यांदा शतकी खेळी केली. ४ किंवा त्यापेक्षा अधिक शतके करणारा केवळ तिसरा खेळाडू. समी अस्लम (६) आणि उन्मुक्त चंद (५) हे अन्य खेळाडू
६.
शुभमन गिलची १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात १७१.५०ची सरासरी असून त्याने कारकिर्दीत १११ची सरासरी राखली आहे.
७.
१९ वर्षांखालील विश्वचषकात भारत पाकिस्तान सामन्यात शतक करणाराही शुभमन गिल हा पहिला खेळाडू बनला आहे. यापूर्वी पाकिस्तानच्या सलमान बटने २००२मध्ये नाबाद ८५ धावा केल्या होत्या.
८.
युवकांच्या क्रिकेटमध्ये सलग ६ अर्धशतके किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणाराही शुभमन गिल पहिला खेळाडू ठरला.
९.
शुभमन गिल १९ वर्षांखालील विश्वचषकात सलग ४ सामन्यात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला. यापूर्वी मेहिडी हसन मिराजने अशी कामगिरी केली होती.
१०.
आज शुभमन गिलने शतक करताना ९३ चेंडू घेतले. हे भारताकडून १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकातील तिसरे वेगवान शतक आहे. यापूर्वी विराट कोहलीने २००८मध्ये ७३चेंडूत तर २०१६मध्ये रिषभ पंतने ८२ चेंडूत शतकी खेळी केली होती.