भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर – गावसकर मालिकेमध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. यानंतर अनेकांनी भारताच्या विजयानंतर कौतुक केले आहे. यात वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारा यांचाही समावेश आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघासाठी पुढील वाटचाल अवघड मानली जात होती. नियमित कर्णधार विराट कोहलीची पालकत्व रजा व जवळजवळ दहा प्रमुख खेळाडूंची दुखापत भारतीय संघासाठी चिंतेची बाब ठरत होती. मात्र, या सर्व परिस्थितीतही कर्णधार अजिंक्य रहाणेने आपल्या नेतृत्व क्षमतेची चुणूक दाखवत भारतीय संघाला 2-1 अशा फरकाने ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
भारताच्या या विजयानंतर भारताचे माजी दिग्गज क्रिकेट कर्णधार सुनील गावसकर यांची प्रतिक्रिया समोर येत असून, त्यांनी ब्रायन लारा सोबत मालिका विजयानंतर घडलेला प्रसंग उलगडला आहे.
गावसकर हे चॅनेल 7 साठी ऑस्ट्रेलियामध्ये समालोचन करत होते. मालिका पार पडल्यानंतर शेवटच्या दिवशी सर्व समालोचकांची एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीतील प्रसंग उलगडताना गावसकर म्हणाले, “शेवटच्या दिवशी पार्टीमध्ये मी माझा ग्लास घेऊन चालत जात सर्वांशी बोलत होतो. इतक्यातच तेथे ब्रायन लारा आले. त्यांनी मला घट्ट मिठी मारली आणि म्हटले, ‘आपण जिंकलो, आपण जिंकलो.’ ही फारच शानदार मालिका होती व मी माझ्या पुढील जीवनासाठी या आठवणी साठवून ठेवल्या आहेत.”
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानची ही मालिका खरोखरच ऐतिहासिक ठरली. ॲडलेड येथे पराभव पत्करावा लागल्यानंतरही भारतीय संघाने मालिकेत जबरदस्त पुनरागमन करत 2-1 ने विजय मिळवला. भारताच्या या ऐतिहासिक मालिका विजयात कर्णधार अजिंक्यसह युवा खेळाडूंनी विशेष महत्वाची भूमिका बजावली. प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतीमुळे शुभमन गिल, मोहम्मद सिराज, वाशिंग्टन सुंदर सारख्या खेळाडूंना अंतिम 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली. या सर्वच खेळाडूंनी आपल्या निवडीला सार्थ ठरवत उत्तम कामगिरी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
रिषभ पंत प्रत्येक मालिकेनंतर किट बॅग देतो ज्यूनियर क्रिकेटरला, त्यामागे ‘हे’ आहे खास कारण
भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंना चेन्नईला पोहचल्यानंतर ‘इतक्या’ दिवस रहावे लागणार क्वारंटाईन
अफलातून क्षेत्ररक्षक आणि उपयुक्त फलंदाज असूनही दुर्लक्षित राहिलेला मुंबईकर खेळाडू : रामनाथ पारकर