भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने गुरुवारी (१६ सप्टेंबर) मोठा निर्णय घेतला आहे. आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर तो भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. या निर्णयानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी भविष्यात संघाचे कर्णधारपद कोणाला देण्यात यावे? याबाबत भाष्य केले आहे.
सुनील गावसकर यांचे स्पष्ट मत आहे की, टी-२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर जेव्हा रोहित शर्माला कर्णधारपद दिले जाईल. त्यावेळी संघाचे उपकर्णधारपद केएल राहुलला दिले गेले पाहिजे. तसेच त्यांनी बीसीसीआयने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
त्यांनी ‘स्पोर्ट्स तक’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “ही खूप चांगली गोष्ट आहे की, बीसीसीआय पुढचा विचार करत आहे. येणाऱ्या गोष्टींचा विचार करणे देखील तितकेच गरजेचे आहे.”
तसेच सुनील गावसकर पुढे म्हणाले की, “जर भारतीय संघ नवीन कर्णधार तयार करण्याच्या प्रयत्नात असेल तर त्यांनी केएल राहुलकडे अधिक लक्ष केंद्रित करावं. त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे. इंग्लंडमध्ये देखील त्याने अप्रतिम कामगिरी केली होती. तसेच त्याने आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील चांगले प्रदर्शन केले आहे. त्यामुळे त्याला उपकर्णधारपद देण्यात यावे.”
केएल राहुल देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करतो. तसेच आयपीएल स्पर्धेत तो पंजाब किंग्स संघाचे नेतृत्व करतो. सुनील गावसकरांनी केएल राहुलच्या नेतृत्वाचे कौतुक करताना म्हटले की, “राहुलने आयपीएल स्पर्धेत प्रभावी नेतृत्व क्षमता दाखवली आहे. त्याने आपल्या फलंदाजीवर नेतृत्वाचा कुठलाही दबाव येऊ दिला नाही. त्यामुळे सध्या उपकर्णधार पदासाठी राहुलचा विचार केला जाऊ शकतो.”
यावरुन स्पष्ट होते की, गावसकरांनी राहुलला सुरुवातीला उपकर्णधाराची जबाबदारी देत त्याला भावी कर्णधाराच्या रुपात तयार करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘इंग्लंडच्या खेळाडूने बुमराहला अशी शिवी दिली, जी सर्वांपुढे सांगताही येणार नाही’, शार्दुलचा उलगडा
‘रोहितला उपकर्णधारपदावरुन काढून टाका’, वाचा कर्णधार कोहली घेणार होता रोहितची विकेट?