आयपीएल २०२२ मधील ६५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमने-सामने आले. वानखेडे स्टेडियमवर झालेला हा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला. मात्र अखेरीस मुंबई इंडियन्सला ३ धावांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह सनरायझर्स हैदराबादचे स्पर्धेतील आव्हान अजूनही जिवंत आहे.
या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा येणारे फेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सनरायझर्स हैदराबादसाठी यावेळी अभिषेक शर्मा व प्रियम गर्ग या नव्या जोडीने सुरुवात केली. हंगामातील पहिला सामना खेळत असलेल्या गर्गने वेगवान ४२ धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठीने डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने पहिल्यापासून आक्रमण करत मुंबईच्या गोलंदाजांना दबावात टाकले. त्याला निकोलस पूरनने योग्य साथ दिली. त्रिपाठीने हंगामातील तिसरे अर्धशतक झळकावत ४४ चेंडूवर ७६ धावा चोपल्या. पूरनने २२ चेंडूवर ३८ धावा केल्या. मुंबईसाठी युवा रमनदीप सिंह याने सर्वाधिक तीन बळी मिळवले.
विजयासाठी मिळालेले १९४ धावांचे आव्हान पार करताना मुंबईला कर्णधार रोहित शर्मा व ईशान किशन यांनी ९५ धावांची सलामी रोहित आपले अर्धशतक झळकावण्यापासून वंचित राहिला. त्यानंतर मुंबईच्या डावाला चांगलीच गळती लागली. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या टीम डेव्हिडने अखेरच्या काही षटकांमध्ये तुफान बॅटिंग केली. त्याने अवघ्या १८ चेंडूवर ४६ धावा चोपल्या. मात्र, अठराव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर तो धावबाद झाला. पुढील षटक भुवनेश्वर कुमारने निर्धाव टाकले. अखेरच्या षटकात विजयासाठी हव्या असलेल्या १९ धावा करण्यात रमन दीप सिंग याला अपयश आले. सनरायझर्स हैदराबादसाठी उमरान मलिकने सर्वाधिक तीन बळी मिळविले. आक्रमक अर्धशतकी खेळीसाठी राहुल त्रिपाठी याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. आता आपला अखेरचा सामना जिंकून प्ले ऑफसाठी इतर सामन्यांच्या निकालावर सनरायझर्स हैदराबादला अवलंबून राहावे लागणार आहे.