आयपीएल २०२२ चे प्लेऑफचे सामने मंगळवार म्हणजेच २४ मे पासून सुरू होणार आहेत. प्लेऑफ फेरीतील सामन्यांमध्ये जर हवामानामुळे काही बाधा आली, तर सुपर ओव्हरचे आयोजन केले जाणार आहे. सुपर ओव्हर जर बरोबरीत सुटली, तर अजून एक सुपर ओव्हर टाकली जाईल. क्वालीफायर आणि एलिमिनेटरच नाही, तर अंतिम सामन्यात देखील हे नियम लागू असतील.
प्लेऑफच्या सामन्यांमध्ये (IPL Playoffs) जर हवामान बिघडले, तर शक्य असल्यास शेवटी एका षटकाचा म्हणजेच सुपर ओव्हरचा सामना खेळवला जाईल. परंतु, सुपर ओव्हर देखील होऊ शकली नाही, तर मात्र साखळी फेरीच्या गुणतालिकेच्या आधारावर सामन्याचा निकाल जाहीर केला जाईल. सध्या कोलकाता आणि अहमदाबादमध्ये वातावरण खराब दिसत आहे आणि याच पार्श्वभूमीवर हे नियम बनवले गेले आहेत.
कोलकाता आणि अहमदाबादमधील हवामान अंदाज (Weather Forecast) पाहून सामन्याच्या निर्धारित वेळमध्ये दोन तास वाढवले गेले आहे. जेणेकरून जरी सामना उशीरा सुरू झाला, तरी २० षटकांचा सामना पूर्ण होऊ शकेल. या हिशोबाने अहमदाबादमधील क्वालिफायर सामना वातावरण खराब असल्यास रात्री ९.४० वाजता सुरू होऊ शकतो आणि अंतिम सामना १०.१० वाजता देखील सुरू होऊ शकतो. या वेळेवर सामना सुरू झाला, तर संपूर्ण २० षटके टाकली जाऊ शकतात.
नियमांप्रमाणे प्लेऑफचा कोणताही सामना किमान पाच षटकांचा खेळला गेला पाहिजे. जर रात्री १२.२६ मिनिटांपर्यंत सामना सुरू होऊ शकला नाही, तर सुपर ओव्हरच्या माध्यमातून सामन्याचा निकाल काढला जाईल. पण जर सुपर ओव्हर देखील होऊ शकली नाही, तर गुणतालिकेच्या हिशोबाने पुढचा निर्णय घेतला जाईल. एलिमिनेटर आणि क्वालीफायर सामन्यासाठी एकही दिवस राखीव ठेवला गेला नाहीये, पण अंतिम सामन्यासाठी मात्र एक दिवस राखीव ठेवला गेला आहे.
वेळापत्रकानुसार अंतिम सामना २९ मे रोजी अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे, पण या दिवशी जर सामना खेळला गेला नाही, तर ३० मे रोजी हा सामना खेळला जाईल. सामना जर २९ तारखेला सुरू झाला (कमीत कमी एक चेंडू टाकला गेला) आणि वातावरणामुळे मध्येच थांबवावा लागला, तर पुढच्या दिवशी जिथे सामना थांबला होता, तिथून पुन्हा सुरू होईल. परंतु, जर २९ तारखेला फक्त नाणेफेक झाली आणि वातावरण बिघडले, तर मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा नाणेफेक केली जाईल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
फॉर्मात असलेल्या पुजाराचे टीम इंडियात पुनरागमन; प्रतिक्रिया देताना म्हणाला, ‘माझी निवड झाल्याचा..’
धवनचा ‘गब्बर’ विक्रम, आयपीएलमध्ये असा किर्तीमान करणारा बनला जगातील पहिलाच फलंदाज
बापरे! उमरान मलिकचा वेगवान चेंडू आदळला थेट मयंकच्या बरगड्यांवर, सामनाही थांबला






