आशिया कप 2025 (Asia Cup 2025) साठी श्रेयस अय्यरला (Shreyas iyer) भारतीय संघात निवडले गेले नाही. यानंतर अनेक परदेशी खेळाडूंनी अय्यरला संघात न घेतल्याबद्दल निवड समितीवर टीका केली होती. परदेशी खेळाडूंव्यतिरिक्त भारतातील अनेक क्रिकेट तज्ज्ञांनीही अय्यरच्या न निवडीवर प्रश्न उपस्थित केले होते. मात्र आता भारताच्या माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी अय्यरच्या बाजूने बोलणाऱ्या परदेशी खेळाडूंवर नाराजी व्यक्त केली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या माजी दिग्गज खेळाडू एबी डीव्हिलियर्सने (Ab devilliers) त्याच्या यूट्यूब चॅनेलवर अय्यरला न निवडल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. त्याने म्हटले होते की, पडद्याआड काहीतरी घडत आहे. मात्र आता सुनील गावस्कर यांनी परदेशी खेळाडूंवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, परदेशी खेळाडूंनी भारतीय क्रिकेटच्या बाबींमध्ये दखल घेऊ नये.
गावस्कर यांनी स्पोर्ट्स्टारमध्ये लिहिलेल्या त्यांच्या कॉलममध्ये म्हटले आहे की, भारतीय क्रिकेटमध्ये काहीही हिस्सेदारी न ठेवणारे आणि याबाबत फार कमी माहिती असलेले परदेशी खेळाडू या वादात सामील झाले आहेत, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होत आहे. खेळाडू असो किंवा कितीही महान का असो, भारतीय संघाच्या निवडीत त्यांचा काहीही हक्क नाही. त्यांनी त्यांच्या देशाच्या क्रिकेटकडे लक्ष द्यावे आणि आपण भारतीय आपल्या देशाच्या क्रिकेटची काळजी घेऊ.
गावस्कर यांनी पुढे सांगितले की, यासाठी भारतीय माध्यमे देखील जबाबदार आहेत. ती माध्यमे परदेशी खेळाडूंकडे जातात आणि भारतीय क्रिकेटबाबत प्रश्न विचारतात. अनेकदा आपण भारतीय पत्रकारांना परदेशी खेळाडूंनंतर धावताना पाहिले आहे. असे वाटते की जणू आमच्या क्रिकेटला त्यांची मान्यता हवी आहे.






