इंग्लंडविरुद्धची टेस्ट सिरीज 2-2 ने बरोबरीत सुटल्यानंतर टीम इंडियाचा पुढचा मोठा टप्पा म्हणजे आशिया कप 2025, जो 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान संयुक्त अरब अमीरातमध्ये (UAE) खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत भारताला ग्रुप A मध्ये पाकिस्तान, यूएई आणि ओमानसोबत ठेवण्यात आले असून, भारताचे सामने अनुक्रमे 10 सप्टेंबरला यूएईविरुद्ध, 14 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध आणि 19 सप्टेंबरला ओमानविरुद्ध होणार आहेत. आता सर्वांच्या नजरा या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी भारतीय संघात कोणते खेळाडू असतील, यावर लागल्या आहेत.
भारताच्या टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव हर्नियाच्या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा सरावाला परतला आहे. मात्र तो वेळेत पूर्णपणे तंदुरुस्त होईल की नाही, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. दुसरीकडे जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते. जरी सूर्या आणि बुमराह टी20 वर्ल्ड कपच्या योजनेत असतील, तरी ते आशिया कपमधून बाहेर राहू शकतात. विशेषतः सूर्यकुमार यादव जर संघात खेळला नाही, तर कर्णधारपदावरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.
अहवालांनुसार शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन यांची आशिया कपसाठीच्या संघात निवड निश्चित मानली जात आहे. सातत्याने चांगली कामगिरी करणारा श्रेयस अय्यर देखील आपले स्थान सुरक्षित ठेवण्यात यशस्वी ठरू शकतो. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर टी20 संघात संजू सॅमसन, तिलक वर्मा, ध्रुव जुरेल आणि रिंकू सिंग यांनी भारतीय फलंदाजीची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे.
ऑलराउंडर विभागाची जबाबदारी हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि वाशिंगटन सुंदर यांच्या खांद्यावर दिली जाऊ शकते. पेस आक्रमणाची धुरा अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज सांभाळू शकतात. वरुण चक्रवर्तीने टी२० संघात पुनरागमन केल्यानंतर अप्रतिम कामगिरी करत अनेकदा चमकदार प्रदर्शन केले आहे. स्पिन आक्रमणात त्याला कुलदीप यादवची साथ मिळू शकते.
यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, संजू सॅमसन, साई सुदर्शन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद सिराज





