भारतीय संघाचे पुढील काही महिने खूप व्यग्र असणार आहेत. 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत जपानमधील ‘आइची-नागोया’ येथे एशियन गेम्स होणार आहेत. यामध्ये क्रिकेटच्या सामन्यांचे आयोजन 24 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान केले जाणार आहे. यासाठी बीसीसीआयने तयारी सुरू केली असून, 30 मे रोजी भारतीय ऑलिम्पिक संघाला (IOA) 30 संभावित खेळाडूंची यादी दिली आहे. विशेष म्हणजे, टीम इंडियाचा सध्याचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि शुबमन गिल (Shubman gill) यांना या यादीत स्थान मिळालेले नाही.
रिपोर्टनुसार, आयपीएल 2026 मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशी या युवा फलंदाजाचा या 30 जणांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. याशिवाय जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, ईशान किशन, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या आणि अभिषेक शर्मा यांसारख्या दिग्गज खेळाडूंचाही यात समावेश आहे. कर्णधारपदासाठी श्रेयस अय्यर आणि तिलक वर्मा यांची नावे आघाडीवर आहेत.
एशियन गेम्सच्या काळातच टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर 3 वनडे आणि 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. 27 सप्टेंबरपासून वनडे मालिका सुरू होईल, तर 6 ऑक्टोबरपासून टी-20 मालिका खेळली जाईल. यामुळे बीसीसीआयला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी दोन टीम निवडाव्या लागणार आहेत.
बीसीसीआयने जाहीर केलेली 30 संभावित खेळाडूंची यादी!
यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन, संजू सॅमसन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती, अनुकूल रॉय, आयुष बडोनी, हर्ष दुबे, ध्रुव जुरेल, खलील अहमद, ऋतुराज गायकवाड, रवि बिश्नोई, शाहबाज अहमद, शिवम दुबे, विपराज निगम, हर्षित राणा, यश ठाकुर आणि वाशिंगटन सुंदर.






