टी२० विश्वचषकात बुधवारी(३ नोव्हेंबर) भारत त्याच्या स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तान संघासोबत भिडणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. भारताने विश्वचषकाती त्याचे पहिले दोन सामने गमावले आहेत आणि स्पर्धेत कायम राहण्यासाठी अफगाणिस्तानला पराभूत करणे महत्वाचे झाले आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानला उपांत्य सामन्यात स्थान बनवण्यासाठी भारताला पराभूत करावे लागणार आहे. भारतीय संघासाठी अफगाणिस्तानचे आव्हान सोपे नसणार आहे. अशात माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने या सामन्यापूर्वी भारतीय संघाला एक महत्वाची चेतावणी दिली आहे.
गंभीरच्या मते अफगाणिस्तान संघाला भारत हलक्यात घेऊ शकत नाही आणि हे आव्हान सोपे नसणार आहे. या सामन्यापूर्वी गौतम गंभीर स्टार स्पोर्ट्सवर बोलत होता. यावेळी तो म्हणला की, ‘अफगाणिस्तान संघाला हलक्यात घेतले जाऊ शकत नाही. त्याची गोलंदाजी बांगलादेश आणि श्रीलंकेपेक्षा उत्कृष्ट आहे. अफगाणिस्तान असा संघ नाहीये, ज्याला तुम्ही सहजासहजी पराभूत कराल.’
‘जेव्हा धावा होत नाहीत, तेव्हा फलंदाज संघात आपली जागा कायम ठेवण्यासाठी खेळतात. अशात भारतीय संघाची सध्याची स्थिती फलंदाजांसाठी प्रेरणा देण्याच्या कामी येऊ शकते. फलंदाजांकडे आता एकच पर्याय आहे की, त्यांनी मैदानात जावे आणि धावा कराव्या. नेट रन रेटच्या ऐवजी तुम्ही सामना जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा तुम्ही सामन्यावर मजबूत पकड बनवता, त्यानंतर परिस्थितीप्रमाणे खेळू शकता’, असेही गंभीर पुढे बोलताना म्हणाला.
दरम्यान, विश्वचषकात भारताने त्याचे पहिले दोन्ही सामने पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाविरुद्ध गमावले आहेत. अशात भारतीय संघ उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचेल, याची खूपच कमी अपेक्षा आहे. जर भारतीय संघाने त्याचे पुढचे तीनही सामने जिंकले आणि न्यूझीलंडने अजून एक सामना गमावला, तर भारतीय संघ उपांत्य सामन्यापर्यंत पोहचण्याची अपेक्षा आहे. असे झाले नाही, तर भारतीय संघ जवळपास स्पर्धेतून बाहेर गेलेला आहे.
अफगाणिस्तानचा विचार केला, तर त्यांनी विश्वचषकात आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि यापैकी दोन सामने जिंकले आहेत. अफगाणिस्तानने स्कॉटलंड आणि नामिबिया या दोन संघांवर सहज विजय मिळवला होता, तर पाकिस्तानविरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवायचा असेल, तर टीम इंडियासाठी महत्त्वाचे ठरू शकतात हे ५ फॅक्टर
टी२० विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठल्यानंतरही ‘या’ बाबतीत पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम संघावर नाखूष
“शास्त्री आणि व्यवस्थापनाने दोन वर्षांत काहीच केले नाही”; भारतीय दिग्गज भडकला






