टी२० पुरूषांचा विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर आला असताना बांग्लादेश क्रिकेट बोर्डच्या (बीसीबी) मागण्या काही कमी होताना दिसत नाही. आधी त्यांनी राजकीय कारणांमुळे भारतात सामने खेळण्यास मनाई करत वादाला सुरूवात केली होती. आता त्यांना आर्यलंडसोबत गटातील जागा बदलायची आहे. याबाबत आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) काय निर्णय घेईल याकडे लक्ष आहे.
काही रिपोर्ट्सनुसार , बीसीबीने आयसीसीला साखळी सामन्यांतील त्यांची जागा आर्यलंडसोबत बदलण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे आर्यलंड क्रिकेट बोर्डनेही (सीआय) त्यांचे सामने श्रीलंकेबाहेर खेळण्यास मनाई केली आहे. सीआयच्या एका अधिकाऱ्यांनी म्हटले, “आम्हाला स्पष्ट सांगितले गेले आहे की आम्ही सामन्यांच्या ठरवलेल्या वेळापत्रकात बद करू नये. यामुळे आम्ही आमचे साखळी सामने श्रीलंकेतच खेळणार आहोत.”
आगामी टी २० विश्वचषकाचे गट पाहिले तर बांग्लादेश क गटात आहे. यामध्ये इंग्लंड, इटली, नेपाळ आणि वेस्ट इंडिज या संघांचा समावेश आहे. यातील बांग्लादेशचे तीन सामने कोलकाता आणि एक सामना मुंबईमध्ये खेळला जाणार आहे. तसेच आयर्लंड ब गटात असून त्यात यजमान श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, ओमान, झिम्बाब्वे संघ आहेत. हे चारही सामने श्रीलंकेत खेळले जाणार आहेत.
सुरक्षेच्या कारणांमुळे बांग्लादेशने आधीच भारतात खेळण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर बांग्लादेशच्या स्थानिक खेळाडूंनीही भारतात खेळण्यास कडक विरोध केल्याने बीसीबीने आयसीसीला ठिकाण बदलण्याची मागणी केली. प्रकरण वाढत चालल्याने आयसीसीच्या दोन सदस्याच्या संघानेही बीसीबीची भेट घेतली.
आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी या भेटीत बीसीबीला भारतातील सुरक्षा आणि वेळापत्रकाचे पालन करण्यास सांगितले. तर बीसीबीने सामने श्रीलंकेत खेळवण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी संघाबरोबर चाहते आणि मीडिया यांचाही विचार करण्याचे सुचविले.
आयर्लंडने तर त्यांचे गट बदलण्यास स्पष्ट नकार दिला असून आयसीसी बांग्लादेशबाबत काय निर्णय घेईल याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे. टी २० विश्वचषकाचा थरार ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.






