क्रिकेटविश्वात पुरूष संघांच्या टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ७ फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरूवात होणार असून पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध नेदरलॅंड्स यांच्यात खेळला जाणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद गतविजेत्या भारताबरोबर श्रीलंकाही भुषविणार आहे. टी२० विश्वचषक म्हटला की चाहत्यांना भारताच्या युवराज सिंगने मारलेले ते गगनचुंंबी सहा षटकार आणि जलद अर्धशतक आठवते, मात्र भारताकडून टी२० विश्वचषकात कोणी पहिले अर्धशतक केले आहे हे माहित आहे?
२००७च्या टी२० विश्वचषकात भारताच्या गौतम गंभीरनेही अर्धशतक केले होते. त्याने न्यूझीलंडविरुद्ध ३३ चेंडूत ५१ धावा केल्या होत्या. त्याच आवृत्तीत भारताच्या तीन खेळाडूंनी इंग्लंडविरुद्ध अर्धशतक केले होते. ज्यामध्ये युवराज सिंग, गंभीर आणि विरेंद्र सहवाग याचा समावेश आहे.
इंग्लंडविरुद्धच्या त्या सामन्यात गंभीर आणि सेहवाग यांनी पहिल्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी केली होती. गंभीर ५८ धावा (४१ चेंडू) आणि सेहवाग ६८ धावा (५८ चेंडू) करत बाद झाले. त्यानंतर युवराजचे वादळ आले. त्याने या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला मारलेले एकाच षटकातील सहा षटकार क्रिकेटचा कोणताच चाहता विसरणार नाही. याबरोबरच युवराजने भारताकडून सर्वात जलद टी२० अर्धशतकही केले होते.
या तिघांनीही अर्धशतकी खेळी केल्या त्याच्याआधीच भारताच्या एकाने संघासाठी पहिले आणि विश्वचषकातीलही पहिले अर्धशतक केले होते. रॉबिन उथप्पा. आंतरराष्ट्रीय टी२० आणि टी२० विश्वचषकात भारताकडून पहिले अर्धशतक रॉबिन उथप्पाने केले होते.
उथप्पाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ५० धावा केल्या होत्या. तेव्हा गंभीर आणि सेहवाग लवकरच बाद झाले. त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ३९ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकार मारत हे अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या या उत्तम कामगिरीमुळे संघाने पाकिस्तानसमोर विजयासाठी १४२ धावसंख्या उभारली.
पुढे हा सामना बरोबरीत निघाला. तेव्हा सुपर ओव्हर नाही तर बॉल-आऊटमध्ये सामन्याचा निकाल लागला. भारताने हा सामना जिंकला आणि पुढे अंतिम सामन्यात पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभूत करत पहिला टी२० विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली.
उथप्पाने नंतर इंडियन प्रिमीयर लीगही (आयपीएल) खेळली. त्यामध्ये त्याने कोलकाता नाईट रायडर्ससोबत २०१४मध्ये चेन्नई सुपर किंग्जसोबत २०२१चे विजेतेपद जिंकले.






