आगामी पुरूषांचा टी२० विश्वचषक २०२६ भारत आणि श्रीलंकेत खेळला जाणार आहे. या स्पर्धेची सुरूवात ७ फेब्रुवारीपासून होणार आहे. त्याआधीच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्डमध्ये (बीसीबी) स्पर्धेत न खेळण्याची हालचाल सुरू झाली. बीसीबीने या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानही यामध्ये खेळणार नाही अशी भुमिका घेतली आहे. बांग्लादेशच्या न खेळण्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) शिक्कामोर्तब केले असून पाकिस्तानला मात्र ताकिद दिली आहे.
काही रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान टी२० विश्वचषकात नाही खेळला तर तो कोणत्यात आंतरराष्ट्रीय संघासोबत द्विपक्षीय मालिका खेळू शकणार नाही. त्याचबरोबर त्यांचे आशिया कपचे सदस्यत्वही रद्द केले जाईल. तसेच विदेशी खेळाडूंसोबत पीएसएलचा (पाकिस्तान सुपर लीग) करारही करता येणार नाही. यावरून आयसीसीच्या या सर्व शर्यतींमुळे संपूर्ण पाकिस्तान क्रिकेटच नष्ट होऊ शकतो. कारण यानंतर ते केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये खेळू शकतात.
शनिवारी (२४ जानेवारी) आयसीसीने बांग्लादेश टी२० विश्वचषकात खेळणार नाही, असे जाहीर केले होते. त्याचबरोबर त्यांची जागा स्कॉटलंड घेणार हे पण स्पष्ट केले होते. यामुळे स्कॉटलंड या स्पर्धेत गट सीमध्ये असणार आहे. या गटात इंग्लंड, ईटली, नेपाळ आणि वेस्ट इंडिज यांचा समावेश आहे.
“आयसीसीने भारत- पाकिस्तान सामने हलवले, तर बांग्लादेशचे का नाही?” असा प्रश्न पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी आयसीसीला विचारला. बांग्लादेश सरकारने त्यांचा संघ विश्वचषकात खेळणार नाही, असे स्पष्ट केले असता नकवी यांनीही पाकिस्तानही या स्पर्धेत खेळणार नाही असे म्हटले होते.
पाकिस्तान संघाच्या स्पर्धा खेळण्यावर सरकार निर्णय घेईल असेही नकवींनी म्हटले आहे. त्यानंतर आयसीसीने पाकिस्तानही या स्पर्धेत खेळला नाहीतर मोठे परिणाम होतील अशी ताकिद दिली आहे.
बांग्लादेश आणि भारतात काही राजकिय कारणांमुळे तणाव निर्माण झाला आहे. यानंतर बांग्लादेशला त्यांचे खेळाडू भारतात सुरक्षित नाही, असा निष्कर्ष काढत स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यांचे टी२० विश्वचषकाचे सामने मुंबई आणि कोलकाता येथे खेळले जाणार होते. हे सामने त्यांनी श्रीलंकेत हलवण्याची मागणी आयसीसीकडे दिली होती. ढाकामध्ये झालेल्या चर्चासत्रात आयसीसीने मात्र त्यांची ही मागणी धुडकावून लावत भारत त्यांच्यासाठी सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला होता.






