वेस्ट इंडीज आणि भारत यांच्या दरम्यान सुरू असलेल्या त्रिनिदाद येथील दुसऱ्या कसोटी सामन्यावर भारतीय संघाने आपली पकड मजबूत केली आहे. चौथ्या दिवशी भारतीय संघाच्या गोलंदाजांनी व फलंदाजांनी शानदार कामगिरी करत, यजमान संघाला बॅकफुटवर ढकलले. पहिल्या डावात मिळालेल्या 183 धावांच्या आघाडीनंतर भारतीय संघाने दुसऱ्या डावात आणखी 181 धावा करत वेस्ट इंडिज संघासमोर विजयासाठी 365 धावांचे आव्हान ठेवले. त्याचा पाठलाग करताना यजमान संघाने दोन बाद 76 अशी मजल मारली आहे.
मोहम्मद सिराज याने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला यजमान संघ केवळ 26 धावांची भर घालून तंबूत परतला. वेस्ट इंडीज 255 धावांवर सर्वबाद झाल्याने भारतीय संघाला 183 धावांची आघाडी मिळाली. ही आघाडी घेऊन दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाला कर्णधार रोहित शर्मा व यशस्वी जयस्वाल यांनी 98 धावांची सलामी दिली. रोहितने 44 चेंडूंवर 5 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 57 धावांची आक्रमक खेळी केली.
पावसाच्या व्यत्ययामुळे लंचनंतर खेळ काहीसा उशिरा सुरू झाल्यानंतर यशस्वी जयस्वाल 39 धावा करून तंबूत परतला. मात्र, चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या ईशान किशन याने 33 चेंडूंवर तुफानी अर्धशतक ठोकले. त्याच्या अर्धशतकानंतर रोहितने भारतीय संघाचा डाव घोषित केला.