ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या मराठमोळ्या अजिंक्य रहाणेवर अजूनही शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेमध्ये दैदीप्यमान कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाचे कर्णधारपद रहाणेने भूषवले होते. ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर जाऊन पराभूत करण्याची किमया केल्याने रहाणेवरील कौतुकाचा ओघ कमी झाला नाही. भारतीय क्रिकेट इतिहासातील न्यूनतम धावसंख्येवर बाद झाल्यानंतरही भारतीय संघाने जोरदार पुनरागमन करत कसोटी मालिका जिंकली. नुकतेच या विशेष कामगिरीचे कौतुक राज्यसभेतही करण्यात आले.
उपराष्ट्रपतींनी केले कौतुक
भारताचे उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती व्यंकया नायडू यांनी कर्णधार अजिंक्य रहाणे आणि संपूर्ण संघाचे या अविस्मरणीय विजयाबद्दल राज्यसभेतील कार्यक्रमात कौतुक केले. नायडू यांनी यापूर्वी १९ जानेवारी रोजी ट्वीट करत संघाचे अभिनंदन केले होते.
अर्थमंत्र्यांनी दिले भारतीय संघाच्या कामगिरीचे उदाहरण
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील १ फेब्रुवारी रोजी झालेल्या त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचा उल्लेख केला. अर्थमंत्री म्हणाल्या, “२०२० हे वर्ष आपल्या सर्वांसाठीच कठीण होते. मात्र, भारतीयांनी याचा जिद्दीने सामना केला. भारतीय अर्थव्यवस्थेवरही याचा काहीसा विपरीत परिणाम झाला. आपण ती विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याचा प्रयत्न केला. आपल्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया तसेच प्रतिकूल परिस्थितीतून पुनरागमन करत विजय मिळवला. या विजयाने भारतीय लोकांच्या ताकदीची आणि जिद्दीची जगाला जाणीव करून दिली.”
पंतप्रधानांनी केला होता उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या दर महिन्याला होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून भारतीय संघाचे गुणगान गायले होते. ते म्हणालेले, “या महिन्यात क्रिकेटच्या पीचवरून चांगली बातमी समोर आली. आपल्या क्रिकेट संघानेने पहिल्या सामन्यातील पराभवानंतर खडतर मार्ग पार करत शानदार पुनरागमन केले आणि ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी करून दाखवली. खेळाडूंची कठोर मेहनत आणि त्यांनी संघ म्हणून पार पाडलेले कार्य प्रेरणादायक आहे.”
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात साकारला मालिकाविजय
नियमित कर्णधार विराट कोहली पहिला कसोटी सामन्यानंतर मायदेशी परतल्यामुळे उपकर्णधार अजिंक्य रहाणे खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी टाकण्यात आली होती. पहिल्या सामन्यातील नामुष्कीजनक पराभवानंतर मेलबर्न येथील दुसऱ्या सामन्यात रहाणेने दमदार शतक झळकावत भारताला विजयी करण्यात सिंहाचा वाटा उचलला. पाठोपाठ सिडनी कसोटी अनिर्णीत व अखेरची ब्रिस्बेन कसोटी जिंकत चार सामन्यांची मालिका २-१ ने आपल्या नावे केली.






