भारताचे दोन खेळाडू ज्यांनी क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिले. आर अश्विन आणि विराट कोहली हे खूप काळ क्रिकेटमध्ये संघसहकारी म्हणून राहिले. दोघांनी भारताच्या कसोटी संघात २०११मध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर विराट कर्णधार असताना त्याने अनेकदा प्रमुख फिरकीपटू म्हणून अश्विनला अधिक संधी दिल्या होत्या. त्याच्या नेतृत्वात अश्विनने चांगली कामगिरी करत अनेक विक्रमेही केली होती.
दोघांनी एकत्र खेळत संघाला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहे. त्यामध्ये २०१८च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा समावेश आहे. घरच्या मैदानावर भारताचे कसोटीतील वर्चस्वही त्या दोघांच्या कारकिर्दीतच होते. तेव्हा भारत सलग पाच वेळा आयसीसीच्या (आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना) कसोटी जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावरही होता.
विराट- अश्विन दोघांनी कसोटीमधून निवृत्तीही एकामागोमाग जाहीर केली. त्या दोघांमध्ये मतभेद होते अशा अनेकदा चर्चा झाल्या होत्या, मात्र अश्विनने संघातील त्याच्या शेवटच्या काळात या सर्व अफवांना खोटे ठरविले. अश्विनने निवृत्ती घेण्याआधीचा त्याचा आणि विराटचा तो गळाभेटीचा फोटोही चांगलाच व्हायरल झाला होता.
क्रिकेटनंतर अश्विन सध्या सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह दिसतो. त्यामध्ये अनेकदा त्याला ट्रोलही केले जाते किंवा तो तरी इतरांना ट्रोल करतो. नुकतेच त्याने ‘एक्स’वर विराटबाबत लिहिलेली पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यामध्ये त्याने लिहिले, “मी आत्ताच विराटशी बोललो, त्याला ‘इनडायरेक्ट अटॅक’ आणि त्याची सोशल मीडियावर होणारी चर्चा याबाबत सांगितले, त्यानंतर आम्ही दोघे खूप हसलो. तसेच आम्हाला एकमेकांशी बोलण्याची संधी दिली याबद्दल आभारी आहे.”
अश्विनचे युट्युबवर ‘ऍश की बात’ नावाचा कार्यक्रमही आहे. याच्याच एका भागात ‘अश्विनने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये विराटला कमी लेखले असून रोहित शर्मा उत्तम. तसेच टी२० विश्वचषक २०२४ जिंकण्याचे श्रेय सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराहला दिले आहे,’ असे एका यूजरने एक्सवर म्हटले होते.
या यूजरला अश्विनने एक्सवर पोस्ट करत उत्तरही दिले आहे. ज्यामध्ये त्याने यूजरच्या या प्रतिक्रियेबाबत सांगण्यासाठी विराटला फोन केल्याचे म्हटले. अशी पोस्टही त्याने केली असून ती आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अश्विन भारताचा कसोटीमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजही आहे. ही कामगिरी त्याने विराटच्याच नेतृत्वात केली होती.






