आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये भारताने सुपर-८चा पहिला सामना गमावला. रविवारी (२२ फेब्रुवारी) झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिका ७६ धावांनी जिंकली. यामुळे आता भारत दुसरा सामना खेळण्यास चेन्नईमध्ये पोहोचला आहे. खेळाडू विमातळावर पोहोचले असून त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या त्याच्या गर्लफ्रेंडच्या गळ्यात हात टाकून बाहेर पडताना दिसत आहे. त्यानंतर खेळाडू बसमध्ये बसले असून भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवही त्याची पत्नी देविशा शेट्टीसोबत दिसत आहे.
या स्पर्धेत भारताचा पुढील सामना २६ फेब्रुवारीला आहे. झिम्बाब्वेविरुद्धचा हा सामना भारतासाठी उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्वाचा आहे. एमए चिंदबरम स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार असून सामन्याची सुरूवात संध्याकाळी ७ वाजता होणार आहे.
या स्पर्धेत भारताने पहिला सामना अहमदाबादमध्ये खेळला होता. त्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करमने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा त्यांनी पहिल्या तीन विकेट्स २० धावा करत ४ षटकातच गमावल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेची अशी स्थिती पाहून ते १५० पार तरी जातील की नाही ही शंका निर्माण झाली होती. अशातच डेविड मिलरने महत्वपूर्ण खेळी केली. त्याने ३५ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ६३ धावा केल्या होत्या. तसेच त्याने डेवाल्ड ब्रेविससोबत चौथ्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने भारताला १८८ धावांचे लक्ष्य दिले होते.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरूवात निराशाजनक झाली. संघानेही पॉवरप्लेमध्ये ३ विकेट्स गमावल्या. तसेच नंतर एकही खेळाडू उत्तम कामगिरी करू शकला नाही, शिवम दुबे वगळता. त्याने ४२ धावा केल्या मात्र त्या कमी पडल्या. यावेळी भारताने १८.५ षटकात सर्व विकेट्स गमावत १११ धावा केल्या. त्यामुळे भारताला नेट रनरेटमध्ये मोठे नुकसान झाले आहे.
या स्पर्धेत भारताचा शेवटचा सुपर-८चा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध आहे. हा सामना एक मार्चला कोलकातामध्ये खेळला जाणार आहे.






