आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात होऊन आद्याप काहीच दिवस झाले आहेत. या हंगामात पार पडणाऱ्या प्रत्येक सामन्यासोबत संघांमधील प्रतिस्पर्धा अधिकच रोमांचक होत चालली आहे, तर दुसरीकडे युवा आणि अनुभवी खेळाडूही स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत.
मागच्या हंगामात धमाका करणारे ३ भारतीय युवा खेळाडू, जे आयपीएल २०२२ मध्ये ठरत आहेत अपयशी
आयपीएलच्या या चालू हंगामात देश- विदेशातील अनेक युवा खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. चालू हंगामात अनेक युवा खेळाडूंना पदार्पणाचीही संधी मिळाली आहे, तर दुसरीकडे असे काही खेळाडू आहेत, जे मागच्या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये होते आणि या हंगामातही त्यांच्याकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा होती. परंतु हे खेळाडू अपेक्षित प्रदर्शन करताना दिसत नाहीयेत. चला तर नजर टाकून ३ अशा भारतीय युवा खेळाडूंवर ज्यांनी मागच्या हंगामात तुफान प्रदर्शन केले होते, पण चालू आयपीएल हंगामात अद्याप अपेक्षित प्रदर्शन करू शकलेले नाहीत.
नीतिश राणा (Nitish Rana)
आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) चालू हंगामात चांगले प्रदर्शन करत आहे, पण त्यांचा युवा फलंदाज नितीश राणा अपयशी ठरताना दिसत आहे. मागच्या हंगामातील चांगल्या प्रदर्शनामुळे केकेआरने मेगा लिलावात मोठी रक्कम खर्च करून त्याला विकत घेतले, पण तो अद्याप चमक दाखवू शकला नाहीय. राणाच्या फलंदाजीतील सर्वात वाईट गोष्ट ही दिसली की, तो सतत चुकीचे शॉट खेळून विकेट गमावत आहे. त्याने हंगामात आतापर्यंत ४ सामन्यांमध्ये अवघ्या ३९ धावा केल्या आहेत. त्याच्याकडे गुणवत्ता ठासून भरलेली आहे, पण त्याचा उपयोग होताना दिसत नाहीये.
यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal)
राजस्थान रॉयल्सने (RR) आयपीएल २०२२ पूर्वी तीन खेळाडूंना रिटेन केले होते. या तीन खेळाडूंमध्ये कर्णधार संजू सॅमसन, जोस बटलर आणि युवा यशस्वी जयस्वाल यांचा समावेश होता. यशस्वीमध्ये फ्रँचायझी भविष्यातील मोठा खेळाडू पाहत आहे. त्याच्याकडे गुणवत्ताही आहे, पण चालू हंगामात तो अपेक्षित प्रदर्शन करू शकलेला नाहीय. आतापर्यंत खेळलेल्या ३ सामन्यांमध्ये त्याने फक्त २५ धावा केल्या आहेत. या खराब प्रदर्शनामुळे त्याने फ्रँचायझीच्या अपेक्षांवर पाणी फेरल्याचे दिसते. असे असले तरी, आगामी सामन्यांमधील त्याच्या प्रदर्शनावर चाहत्यांच्या नजरा असतील.
ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad)
मागच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडने मोठा धमाका केला होता आणि संघाला अंतिम सामन्यापर्यंत घेऊन गेला होता. मागच्या हंगामात त्याने सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅपचा मानकरी बनला होता. या जबरदस्त प्रदर्शनानंतर त्याच्याकडून चाहत्यांना चालू हंगामात खूप अपेक्षा होत्या, पण तो या अपेक्षांना पात्र ठरताना दिसत नाहीये. या हंगामात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांमध्ये त्याने केवळ २ धावा केल्या आहेत. मागच्या हंगामाच्या तुलनेत त्याचे चालू हंगामातील प्रदर्शन खूपच खराब आहे आणि चाहते याविषयी नाराजी व्यक्त करत आहेत. संघालाही त्याचा खराब फॉर्ममुळे फटका बसला आहे. सीएसकेने त्यांचे पहिले तिन्ही सामने गमावले आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मयंकच्या थंडावलेल्या बॅटमधून दिग्गजाला गुजरातविरुद्ध मोठ्या खेळीची अपेक्षा; म्हणाला, ‘आता वेळ आलीय…’
Maharashtra Kesari | मोठी बातमी! साताऱ्यात अवकाळी पाऊस, महाराष्ट्र केसरी स्पर्धा तात्पुरत्या स्थगित
Video: नॉर्कियाच्या वेगवान चेंडूवर डी कॉकने ठोकला विचित्र षटकार; पाहून तुम्हालाही फुटेल घाम