येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ कसून तयारी देखील करत आहेत. यंदा या स्पर्धेचे यजमानपद भारताकडेच आहे. परंतु या स्पर्धेचे आयोजन भारतात होणार की युएईमध्ये होणार याबाबत अंतिम निर्णय घेतला गेलेला नाही. अशातच अनेक दिग्गज क्रिकेटपटू या स्पर्धेचा विजेता कोण ठरेल याबाबत भाष्य करत आहेत. आता फाफ डू प्लेसिसनेही कुठले दोन संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचतील याबाबत भाष्य केले आहे.
दक्षिण आफ्रिका संघाचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस याने भारत आणि वेस्ट इंडीज हे दोन संघ विश्वचषक स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार असतील, असे म्हटले आहे. डू प्लेसिसने एका पत्रकार परिषदेत म्हटले की, “क्रिकेटचा प्रकार जितका लहान असतो तितकीच संघांना विजय मिळवण्याची संधी असते. जर असा कुठला संघ असेल ज्यामध्ये तुफानी फटकेबाजी करणारे आणि अनुभवी फलंदाज आहेत. तर तो संघ वेस्ट इंडिज संघ आहे. या संघात असे खेळाडू आहेत. जे तिसऱ्यांदा वेस्ट इंडिज संघाला जेतेपद मिळवून देऊ शकतात. ”
तसेच तो पुढे म्हणाला की,” ज्या खेळाडूंना तुम्ही जास्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना पाहिलं नसेल. ते या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. जसं की,ड्वेन ब्रावो, आंद्रे रसल. जर तुम्ही यांची टी२० क्रिकेटमधील कामगिरी पाहाल तर यांच्याकडे भरपूर अनुभव आहे.”
तसेच भारतीय संघाबद्दल बोलताना तो म्हणाला की, “त्यांच्याकडे (भारतीय संघ) अनुभव आहे. त्यांच्याकडे उत्कृष्ट फिरकी आणि वेगवान गोलंदाज आहेत. अंतिम षटकांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी आणि एक विस्फोटक फलंदाजी करणारे फलंदाज असल्यामुळे ते समतोल राखतात. तसेच इंग्लंड संघ देखील एक मजबूत संघ आहे. परंतु भारत आणि वेस्ट इंडीज माझे आवडते संघ आहेत. ”
फाफ डू प्लेसिसने याचवर्षाच्या सुरुवातीला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण त्याने तो मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळत राहाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे तो देखील दक्षिण आफ्रिकेकडून टी२० विश्वचषकात खेळताना दिसू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
राशीद खानला करायची आहे सचिन तेंडुलकर विरुद्ध गोलंदाजी; ‘हे’ आहे कारण
‘क्या गुंडा बनेगा रे तू?’, लॉर्डस कसोटी ड्रॉ करणार्या इंग्लंडची जाफरने उडवली खिल्ली
असे तीन खेळाडू, ज्यांच्याबद्दल म्हटले जाते की त्यांना वडिलांमुळे मिळाले होते टीम इंडियात स्थान






