अहमदाबाद। शुक्रवारी (१२ मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेला पहिला टी२० सामना इंग्लंडने ८ विकेट्सने जिंकला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला हा सामना जिंकून इंग्लंडने ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. या सामन्यात भारताला पराभव तर स्विकारावा लागलाच; पण भारतीय संघाच्या नावावर एक नकोसा विक्रमही झाला आहे.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी भारतीय संघाला आमंत्रण दिले. मात्र भारताची सुरुवात फारच वाईट झाली. भारताने दुसऱ्याच षटकात सलामीवीर केएल राहुलची विकेट गमावली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने केएल राहुलला १ धावेवर त्रिफळाचीत केले.
त्यानंतर दुसरा सलामीवीर शिखर धवन कसाबसा विकेट वाचवून धावा जोडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र १२ चेंडूत ४ धावा करुन मार्क वूडच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला. अशाप्रकारे भारतीय संघाचे दोन्हीही सलामीवीर त्रिफळाचीत झाले. महत्त्वाचे म्हणजे, टी२० क्रिकेट इतिहासात भारतीय संघाच्या दोन्हीही सलामीवीरांची दांडी उडण्याची ही पहिलीच वेळ होती. याआधी भारतीय संघावर अशी नामुष्की कधीही ओढावली नव्हती.
श्रेयस अय्यरचे अर्धशतक व्यर्थ
राहुल आणि धवनसह कर्णधार विराट कोहलीही स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर इतर फलंदाजांनाही अपेक्षेप्रमाणे साजेशी कामगिरी करता आली नाही. एकट्या श्रेयस अय्यरने संघाचा डगमगता डाव सांभाळत अर्धशतक झळकावले. ४८ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने त्याने सर्वाधिक ६७ धावा काढल्या. यासह भारताने इंग्लंडपुढे १२५ धावांचे लक्ष्य उभारले.
प्रत्युत्तरात गोलंदाजीतही भारतीय खेळाडूंनी निराशाजनक प्रदर्शन केले. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या अवघ्या २ विकेट्स काढत धावा खर्च केल्या. त्यातही अनुभवी गोलंदाज युजवेंद्र चहलने ४ षटकात तब्बल ४४ धावा देत फक्त १ विकेट चटकावली. परिणामत इंग्लंडने १५.३ षटकात भारताचे लक्ष्य पूर्ण केले. इंग्लंडकडून जॉनी बेयरस्टोने ३२ चेंडूत सर्वाधिक ४९ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
1st T20: इंग्लंडने भारताला पाजले पराभवाचे पाणी, ‘हे’ खेळाडू ठरले टीम इंडियाच्या पराभवाचे खलनायक!
INDvENG: खराब कामगिरीमुळे इंग्लिश दिग्गजाने टीम इंडियाची केली थट्टा अन् पडला तोंडघशी