पुढील काही दिवसांतच सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2026) १९ व्या हंगामात चाहत्यांना पुन्हा एकदा धडाकेबाज क्रिकेट पाहायला मिळणार आहे. परंतु, माजी दिग्गजांची विधाने आणि घडामोडींमुळे या मेगा इव्हेंटचा माहोल आधीच तयार झाला आहे. आता दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसने भारताचा यष्टिरक्षक ऋषभ पंतच्या टी२० क्रिकेटमधील गेम प्लॅनच्या अभावावर उघडपणे टीका केली आहे. तसेच, फाफने आयपीएलमधील पंतच्या विक्रमी ‘प्राईस टॅग’वरही (किंमतीवर) प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गेल्या वर्षी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये मार्की खेळाडू म्हणून उतरलेल्या पंतने सर्व विक्रम मोडीत काढले होते. त्यावेळी लखनऊ सुपर जायंट्सने त्याला २७.५० कोटी रुपयांच्या प्रचंड बोलीवर खरेदी केले होते. मात्र, या डावखुऱ्या फलंदाजासाठी तो हंगाम सरासरीच राहिला आणि लखनऊचा संघ गेल्या वर्षी प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नाही. यावर्षी राष्ट्रीय व्हाईट-बॉल संघात आपले स्थान परत मिळवण्याच्या तयारीत असलेल्या पंतला डू प्लेसिसने आत्मचिंतन करण्याचा सल्ला देत त्याच्या फलंदाजीच्या पद्धतीवर प्रश्न उभे केले आहेत.
डू प्लेसिसने स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सांगितले की, “कसोटी क्रिकेटमध्येही त्याच्या फलंदाजीची पद्धत थोडी विखुरलेली वाटते, पण त्याच्या मनात नक्कीच काहीतरी असेल की हाच तो ‘ब्लूप्रिंट’ आहे ज्यानुसार त्याला कसोटी क्रिकेट खेळायचे आहे. टी२० क्रिकेटमध्येही हीच गोष्ट लागू होते. तुम्हाला तुमचा गेम प्लॅन काय आहे हे ठरवावे लागते, जेणेकरून तुम्ही १० पैकी १ किंवा २ सामन्यांचे खेळाडू बनण्याऐवजी ६० ते ७० टक्के सातत्य असलेले खेळाडू बनू शकाल.” पंत आपल्या फलंदाजीच्या अनेक पर्यायांमुळे स्वतःच गोंधळलेला असतो, असे डू प्लेसिसचे मत आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या या कर्णधाराने पुढे म्हटले की, “शेवटी गोष्ट हीच आहे की त्याच्या डोक्यात खूप जास्त पर्याय आहेत. असे वाटते की तो प्रत्येक चेंडूवर मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात षटकार मारू शकतो, पण टी२० फलंदाजीमध्येही एक शिस्त किंवा पद्धत असणे आवश्यक आहे. महान टी२० खेळाडूंच्या बाबतीत तुम्हाला माहित असते की ते कुठे धावा काढतील, कुठून चौकार-षटकार मारतील आणि आपल्या उणिवा सांभाळून कसे खेळतील. मात्र, पंतच्या बाबतीत असे वाटते की तो नेहमीच काठावर उभा आहे. तो कोणत्याही क्षणी बाद होऊ शकतो आणि अनेकदा तर हे सर्व पूर्णपणे घाईगडबडीत केल्यासारखे वाटते.” टी२० क्रिकेटमध्ये सरासरी रेकॉर्ड असलेल्या पंतवर संघ इतकी मोठी रक्कम खर्च करायला का तयार होतात, असा सवालही डू प्लेसिसने उपस्थित केला.
तो म्हणाला की, “तुम्ही लिलावात पंतसारख्या खेळाडूंकडे पाहता तेव्हा विचार करता की, जेव्हा टी२० खेळ इतक्या वर्षांत आकडेवारी आणि विश्लेषणाच्या बाबतीत इतका विकसित झाला आहे, जिथे प्रशिक्षक आणि विश्लेषक आकड्यांचे अतिशय बारकाईने निरीक्षण करतात, मग तरीही एखाद्या खेळाडूबाबत इतकी क्रेझ का आहे? जर तुम्ही त्याची टी२० आकडेवारी पाहिली तर ती इतकी उत्कृष्ट नाही. मग त्याच्यासाठी इतकी ओढ का? गेल्या लिलावातही प्रत्येक संघाला तो आपल्या संघात हवा होता.” पंतने गेल्या हंगामात २४.४५ च्या सरासरीने केवळ २६९ धावा केल्या होत्या.






