आज 2019 वर्षांचा शेवटचा दिवस आहे. या वर्षभरात क्रिकेटवर्तुळात अनेक अविस्मरणीय घटना घडल्या. अनेक विषयांवर मोठ्या चर्चाही झाली. मग यात 2019 विश्वचषकातील अंतिम सामना असो किंवा एमएस धोनीची निवृत्ती असो. अशा क्रिकेटमधील सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या विषयांचा घेतलेला हा आढावा –
आयपीएलमधील मंकडींग प्रकरण –
2019 आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीलाच मंकडींग प्रकरण चांगलेच गाजले होते. या आयपीएल मोसमात किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार आर अश्विनने राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जॉस बटलरला मंकडींग करुन बाद केले होते.
त्यामुळे यावर बरीच चर्चा रंगली. अनेकांनी अश्विनचे कृत्य खेळाडूवृत्तीचे नव्हते असे म्हटले. तर काहींनी त्याला पाठिंबा दिला होता. तसेच अश्विनने जे केले ते नियमाला धरुन होते असे म्हटले.
धोनीची विश्रांती –
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी यावर्षी बराच चर्चेत राहिला. भारतीय संघाचे 2019 विश्वचषकातील आव्हान उपांत्य सामन्यात संपल्यानंतर धोनीने विश्रांती घेतली. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधान आहे.
त्याच्याबद्दल अनेक दिग्गाजांनी विविध मते मांडली. मात्र त्याच्या भविष्याबद्दल कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. काही दिवसांपूर्वी त्यानेच एका कार्यक्रमादरम्यान जानेवारी 2020 पर्यंत याबद्दल काहीही विचारु नका असे सांगितले होते.
मांजरेकर-भोगले वाद –
नोव्हेंबरमध्ये भारत विरुद्ध बांगलादेश संघात कोलकाता येथे पार पडलेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यादरम्यान संजय मांजरेकर आणि हर्षा भोगले यांच्यात ऑन एअर वाद झाले होते. गुलाबी चेंडू फलंदाजाला चेंडू दिसतो की नाही याबाबत या दोघांत वाद झाला होता. हा वाद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
या सामन्यादरम्यान समालोचन करताना मांजरेकर यांनी भोगलेंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नसल्याचे ऐकवले होते. त्यामुळे मांजरेकरांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. पंरतू काही दिवसांपूर्वीच या प्रकरणाबद्दल त्यांनी माफी मागितली असल्याचे सांगितले.
2019 विश्वचषक अंतिम सामना –
14 जूलैला 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात लॉर्ड्स मैदानावर पार पडला. हा अंतिम सामना 50-50 षटकांनंतर बरोबरीत सुटला. यामुळे सुपर ओव्हर घेण्यात आली होती. पण सुपर ओव्हरमध्येही बरोबरी झाली.
त्यामुळे इंग्लंडने न्यूझीलंडपेक्षा अधिक बाउंड्री मारल्या असल्याने इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आले होते. त्यामुळे आयसीसीच्या बाउंड्री काउंट(boundary count) नियमावर अनेकांनी टीका केली होती. तसेच या नियमाबद्दल मोठी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली होती.
त्यामुळे अखेर आयसीसीने हा नियम रद्द केला असून त्याचा आयसीसीच्या पुढील कोणत्याही स्पर्धेत उपयोग केला जाणार नाही.
धोनी – अंपायर वाद –
आयपीएल 2019मध्ये जयपूर येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध चन्नई सुपर किंग्स संघात पार पडलेल्या सामन्यादरम्यान चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी आणि मैदानावरील पंच उल्हास गंधे यांच्यात नो बॉल प्रकरणामुळे वाद झाले होते.
या सामन्यात बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर धोनी बाद झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर मैदानावरील पंच उल्हास गंधे यांनी नो बॉलचा इशारा केला, पण लगेचच स्वेअर लेगवरील पंच ब्रुस ऑक्सनफॉर्डशी चर्चा करुन हा नो बॉलचा निर्णय बदलला.
त्यामुळे मैदानात असलेला रविंद्र जडेजा पंचाशी वाद घालू लागला. काही वेळीत धोनीही मैदानात आला, त्याने पंचाशी चर्चा करत वाद घातल्याचे दिसले. मात्र पंचांनी निर्णय बदलला नाही. त्यामुळे चेन्नईला नो बॉल मिळाला नाही. या प्रकरणाची मोठी चर्चा झाली होती. तसेच धोनीला 50 टक्के मॅच फीचा दंड करण्यात आला होता.
टीम इंडियाच्या या चार गोलंदाजांनी हॅट्रिक घेत गाजवले २०१९ चे वर्ष!
वाचा????https://t.co/rA3J964L8I????#Cricket #म #मराठी #TeamIndia #वर्ष2019— Maha Sports (@Maha_Sports) December 31, 2019
२०१९ मध्ये या ५ भारतीय खेळाडूंनी केले आंतरराष्ट्रीय पदार्पण!
वाचा????https://t.co/d84sroFNGa????#Cricket #TeamIndia #म #मराठी #वर्ष2019— Maha Sports (@Maha_Sports) December 31, 2019