इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 25वा सामना मंगळवारी (दि. 18 एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळला गेला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने 14 धावांनी विजय मिळवला. मुंबईच्या या विजयात मध्यफळीतील फलंदाज तिलक वर्मा याचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. मुंबईच्या या विजयानंतर बोलताना तिलक याने आपल्या यशाचे श्रेय कर्णधार रोहित शर्मा व सचिन तेंडुलकर यांना दिले.
कर्णधार रोहित शर्मा, ईशान किशन व कॅमेरून ग्रीन यांनी केलेल्या दमदार फलंदाजीनंतर तिलक वर्मा याच्याकडून संघाला पुन्हा एकदा अपेक्षा होती. त्याने आपल्या संघ व चाहत्यांची ही अपेक्षा पूर्ण केली. त्याने अवघ्या 17 चेंडूवर 37 धावा करताना 2 चौकार व 4 षटकार ठोकले. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 217 पेक्षाही जास्त राहिला. या हंगामात आतापर्यंत त्याने 53.50 च्या शानदार सरासरीने 214 धावा केल्या असून यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 158 असा जबरदस्त राहिला आहे.
हैदराबादविरुद्धच्या सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला,
“सचिन सरांनी मला इतकेच सांगितले की तुझा माईंडसेट योग्य ठेव. धावा काढायच्या म्हणजे काढायच्या हे मनाशी पक्के कर. रोहितने सांगितले की, फक्त चेहऱ्यावर हसू ठेवायचे आणि आपले शंभर टक्के योगदान द्यायचे. मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे राहिलो आणि आता यश मिळत आहे.”
हैदराबादविरूद्धच्या विजयानंतर बोलताना रोहित यानेदेखील तिलकचे कौतुक केले होते. तिलक याचा खेळ आपल्याला आवडत असून तो लवकरच अन्य संघात देखील खेळताना दिसेल असे त्याने म्हटलेले. त्यामुळे आयपीएलनंतर होत असलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकांमधून तिलक आंतरराष्ट्रीय पदार्पण करू शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे.
(Tilak Varma Reveal How Sachin Tendulkar And Rohit Sharma How Motivate Him)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लखनऊविरुद्धच्या सामन्यापूर्वीच चहलचा मोठा खुलासा! म्हणाला, आम्ही ‘या’ नियमाचा सर्वाधिक फायदा उचलला
अखेर 14 वर्षांचा वनवास संपला! अर्जुनने घडवून आणली क्रिकेट इतिहासातील अतिदुर्मिळ घटना