आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाला चॅम्पियन बनवणाऱ्या कर्णधार सूर्यकुमार यादवचे जोरदार कौतुक होत आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा टी20 फॉरमॅटमधील विक्रम अतिशय शानदार राहिला आहे. न्यूज 24 सोबतच्या खास मुलाखतीत भारतीय टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवने आपल्या यशाबद्दल खुल्या मनाने बोलताना सांगितले की, तो यशस्वी कर्णधार बनण्यासाठी दिग्गज रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्याकडून काही खास गोष्ट “चोरली” आहे.
टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवचा विक्रम उत्तम राहिला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आशिया कप 2025 जिंकला. कर्णधार म्हणून मिळालेल्या यशाचे कारण विचारल्यानंतर, न्यूज 24 सोबत बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, “कर्णधाराचे खरे काम मैदानाबाहेर सुरू होते. तो खेळाडूंशी बसून संवाद साधतो, त्यांना समजून घेतो. मी हे इतर कर्णधारांना करताना पाहिले आणि त्यांच्याकडून शिकलो. मैदानाबाहेर खेळाडूंसोबत वेळ घालवणे आणि त्यांना ओळखणे खूप महत्त्वाचे असते. 2014 मध्ये मी केकेआरकडून खेळत होतो, तेव्हा मी गौतम गंभीर यांना पहिले. आपल्या खेळाडूंशी मैदानाबाहेरही बराच वेळ बोलायचे. कधी स्विमिंग पूलजवळ बसून 3 तास चर्चा चालू असायची, तर कधी टीम रूममध्ये बसून जेवण मागवून सगळ्यांशी गप्पा मारायचे.”
रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्याकडून सूर्यकुमार यादवने कर्णधारपदाबद्दल खूप काही शिकले आहे. याबद्दल सूर्या आपल्या मुलाखतीत बोलताना म्हणाला, “2018 साली मी मुंबई इंडियन्समध्ये आलो आणि रोहित भाऊंच्या नेतृत्वाखाली आयपीएल खेळलो. त्यानंतर 3-4 वर्षांनी भारतीय संघातही रोहित भाऊंच्या कर्णधारपदाखाली खेळलो. मी दोन्ही वेगवेगळ्या कर्णधारांकडून काही गोष्टी ‘चोरल्या’ आहेत. शिकलो असही म्हणू शकतो, पण मी ‘चोरल्या’ असच म्हणतो.”





