भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे खेळला जात आहे. गुरुवारपासून (दि. 9 फेब्रुवारी) खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळ दाखवत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले. दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाकडे 144 धावांची मजबूत आघाडी आहे. एकीकडे ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ अपयशी ठरत असताना पदार्पण करणारा फिरकीपटू टॉड मर्फी याने आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली. त्याने पहिल्याच सामन्यात पाच बळी टिपत वाहवा मिळवली. दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर त्याने बोलताना भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याचा बळी आपल्यासाठी खास असल्याची कबुली दिली.
भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव केवळ 177 धावांवर संपवला. त्यानंतर रोहित शर्माने आक्रमक अर्धशतक झळकावत पहिला दिवस संपूर्णपणे भारताच्या नावे केला होता. मात्र, दिवसाच्या अगदी अखेरीस पदार्पण करणाऱ्या मर्फी याने केएल राहुलला बाद करत स्वतःचा पहिला आंतरराष्ट्रीय बळी मिळवला. दुसऱ्या दिवशी देखील त्याने सकाळच्या सत्रात रवीचंद्रन अश्विन व चेतेश्वर पुजारा यांना तंबूचा रस्ता दाखवला. दुसऱ्या दिवशीच्या लंचनंतरचा पहिलाच चेंडू मर्फी याच्यासाठी खास राहिला.
विराट कोहली स्ट्राइकवर असताना लेग स्टंपवर टाकलेला हा चेंडू विराटच्या बॅटची बाहेरची कड घेऊन यष्टीरक्षक ऍलेक्स केरीच्या हाती विसावला. त्यानंतर भरत याला बाद करत त्याने कारकिर्दीतील पहिले पंचक पूर्ण केले. त्याने या सामन्यात आत्तापर्यंत 36 षटके गोलंदाजी करताना 82 धावा देत 5 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे.
सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला,
“पहिल्याच सामन्यात अशी गोलंदाजी होणे नक्कीच रोमांचक आहे. मात्र, विराट कोहली याचा बळी माझ्यासाठी स्पेशल ठरला. कारण तो क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येकाचाच आयडल आहे. सर्वांची नजर त्याच्यावर असते. मी त्याला बाद करण्यात यशस्वी ठरलो याचा आनंद होतो.”
मर्फी याला केवळ सहा प्रथमश्रेणी सामने खेळण्याचा अनुभव आहे. मात्र, भारतीय खेळपट्ट्यांचा विचार करता त्याला संघात स्थान दिले गेले होते.
(Todd Murphy Said Virat Kohli Wicket Special For Me)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘सेना’ देशांविरुद्ध शतक ठोकण्यात रोहितचाच दबदबा; जे सचिनलाही जमलं नाही, ते ‘हिटमॅन’ने दाखवलं करून
कसोटीच्या पहिल्या डावात विराटकडून चाहत्यांचा अपेक्षाभंग! खेळपट्टीवर नाही देऊ शकला रोहितला साथ