टोकियो। पॅरालिम्पिक २०२० सध्या जपानची राजधानी टोकियो येथे सुरु असून भारतीय खेळाडू या स्पर्धेत दमदार प्रदर्शन करत आहेत. रविवारी (२९ ऑगस्ट) भारताला तीन पदकं मिळाली होती. आता सोमवारी (३० ऑगस्ट) सकाळीच भारतासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. पॅरा नेमबाज अवनी लेखरा हिने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले आहे. हे भारताचे टोकियो पॅरालिम्पिकमधील पहिले सुवर्णपदक, तर एकूण चौथे पदक आहे.
अवनीने महिलांच्या १० मीटर एयर रायफल स्टँडिंग एसएच१ स्पर्धेत सुवर्ण निशाना साधला आहे. तिने एकूण २४९.६ गुण मिळवत विश्वविक्रमही प्रस्थापित केला. पॅरालिम्पिकमधील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. या क्रीडाप्रकारात तिच्यापाठोपाठ चीनच्या की सी झांग हिने २४८.९ गुणांसह रौप्यपदक जिंकले. तर युक्रेनच्या इरिना स्खेतनिकने २२७.५ गुणांसह कांस्यपदक जिंकले आहे.
अवनी पात्रता फेरीमध्ये २१ नेमबाजांमध्ये ७ व्या क्रमांकावर राहिली होती. त्यामुळे तिने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. असे असले तरी तिने अंतिम फेरीत सर्वोत्तम कामगिरी केली.
अंतिम फेरीत अवनीला चीनच्या सी झांगकडून कडवी लढत मिळाली होती. तिने पात्रता फेरीत अव्वल क्रमांक मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे ती सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार होती. मात्र, अवनीने अंतिम फेरीत उत्तम कामगिरी करत सी झांगला मागे टाकत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
जयपूरची रहिवाशी असलल्या अवनीचा ११ व्या वर्षी अपघात झाला होता. ज्यामुळे ती पॅरालाईज झाली होती. ती महिलांच्या १० मीटर एयर रायफल स्टँडिंग एसएच१ क्रीडाप्रकारात जागतिक क्रमवारीत ५ व्या क्रमांकावर आहे.
भारताला यापूर्वी रविवारी २ रौप्य आणि १ कांस्यपदक मिळाले आहे. भावनीबेन पटेलने टेबलटेनिसमध्ये, तर निषाद कुमारने उंच उडीमध्ये रौप्यपदक जिंकले आहे. तसेच विनोद कुमारने थाळी फेकीमध्ये कांस्यपदक आपल्या नावे केले आहे, मात्र, सध्या त्यांचे पदक होल्डवर ठेवण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रौप्य पदक विजेत्या भाविना पटेलच्या गावात गावकऱ्यांनी गरबा खेळून ऐतिहासिक विजय केला साजरा
पॅरालिम्पिकमध्ये भारताला दिवसातील तिसरे पदक, ४१ वर्षीय विनोद कुमारने जिंकले ‘कांस्य’






