राजकोट। सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सध्या सौराष्ट्र विरुद्ध बंगाल संघात रणजी ट्रॉफी २०१९-२० चा अंतिम सामना सुरु आहे. पण हा सामना सुरु असताना काल(९ मार्च) सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानातील पंच चेत्तीथोडी शमशुद्दीन यांच्या ओटीपोटाजवळ चेंडू लागला. त्यामुळे ते या सामन्यातून बाहेर पडले आहेत.
काल चेंडू लागल्यानंतर रात्री तीव्र वेदना होत असल्याने शमशुद्दीन आज दुसऱ्या दिवशी मैदानात पंचगिरी करण्यासाठी आले नाहीत. ते आज सकाळी हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेले होते.
त्यामुळे आज शमशुद्दीन यांच्या अनुपस्थितीत पहिल्या सत्रात मैदानावरील दुसरे पंच अनंता पद्मनाभन यांनीच दोन्ही एन्डला अंपायरिंग केली. कारण तिसरे पंच एस रवी यांना टीव्ही पंच म्हणून काम असल्याने ते मैदानावर येऊ शकले नाहीत. तसेच स्क्वेअर लेग पंच म्हणून स्थानिक पंच पियूष खाकर यांनी काम पाहिले.
आज दुसऱ्या सत्राचा खेळ सुरु झाल्यानंतर रवी हे पद्मनाभन यांच्यासह मैदानावरील पंच म्हणून मैदानात आले. तर हॉस्पिटलमधून परतलेले शमशुद्दीन यांनी टीव्ही पंचाची भूमिका स्विकारली.
आता या सामन्याच्या तिसऱ्या दिवसापासून म्हणजेच उद्यापासून यशवंत बर्दे हे शमशुद्दीन यांचे बदली पंच म्हणून पद्मनाभन यांच्यासह मैदानावरील पंच म्हणून काम पाहतील.
शमशुद्दीन यांच्या दुखापतीबद्दल सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने माहिती दिली की ‘शमशुद्दीन यांना रात्री तीव्र वेदना होत असल्याने ते आज सकाळी हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेले होते. त्यांना आठवडाभरासाठी आराम करण्यास सांगण्यात आले आहे.’
महत्त्वाच्या बातम्या –
–दक्षिण आफ्रिकेचा ‘हा’ खेळाडू वाढवणार भारताचे टेंशन
–दक्षिण आफ्रिका संघाला कोरोना व्हायरसची भीती, भारत दौऱ्यात टाळणार हस्तोंदलन