भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये झारखंड संघाकडून बाद फेरीत खेळणार असल्याची चर्चा होती. परंतू शनिवारी झारखंडचे प्रशिक्षक राजीव कुमार यांनी धोनी या स्पर्धेला मुकणार असल्याची माहिती दिली आहे.
धोनीच्या या स्पर्धेतील समावेशाबद्दल स्पोर्ट्सस्टारने दिलेल्या वृत्ताप्रमाणे राजीव कुमार म्हणाले, “त्याला 16 आॅक्टोबरला हैद्राबादमध्ये वनडे कॅम्पसाठी रिपोर्ट करायचा आहे. याच कारणामुळे तो बाद फेरीसाठी (विजय हजारे ट्रॉफी) उपलब्ध नसेल. असे आम्हाला सांगितले आहे.”
झारखंड साखळी फेरीमध्ये सी गटात अव्वल क्रमांकावर असून त्यांनी इशान किशनच्या नेतृत्वाखाली 9 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तर दोन सामन्यांचे निकाल लागले नाही. तसेच 14 आॅक्टोबरपासून विजय हजारे ट्रॉफीचे बाद फेरीतील सामने सुरु होणार आहेत.
बाद फेरीतील झारखंडचा सामना महाराष्ट्र विरुद्ध 15 आॅक्टोबरला बंगळूरुमध्ये पार पडणार आहे.
त्यामुळे आता धोनी विंडिज विरुद्ध 21 आॅक्टोबरपासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेत खेळताना दिसेल. त्याची या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. त्याचबरोबर त्याचा पर्यायी यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतचीही निवड करण्यात आली आहे.
त्यामुळे धोनीकडे विंडिज विरुद्धच्या मालिकेआधी विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळून फलंदाजीचा सराव करण्याची चांगली संधी होती. असे असले तरी धोनी झारखंड संघाला मार्गदर्शन करत असल्याचे याआधीच झारखंड क्रिकेटचे सचिव देबासिश चक्रवर्ती यांनी सांगितले होते.
ते म्हणाले, “सप्टेंबर महिन्यापासून धोनी झारखंडच्या संघाबरोबर असून तो संघ मार्गदर्शकाच्या भुमिकेत आहे. त्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे.”
महत्त्वाच्या बातम्या:
–असा पराक्रम करणारा रिषभ पंत धोनी नंतरचा दुसराच भारतीय यष्टीरक्षक
–पी कश्यपचा पासपोर्ट गहाळ; भारतीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची मागितली मदत