विराट कोहली हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात महान खेळाडूंपैकी एक आहे. आजचा दिवस त्याच्यासाठी अतिशय खास आहे. 18 ऑगस्ट 2008 रोजी कोहलीने श्रीलंकेविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर कोहली फक्त वनडेच नाही तर टेस्ट आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला. आपल्या 17 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत कोहलीने टीम इंडियाच्या यशामध्ये मोठे योगदान दिले आहे.
टेस्ट क्रिकेटमध्ये आज भारत हा सर्वात दमदार संघांपैकी एक मानला जातो. याचे पूर्ण श्रेय विराट कोहलीला जाते. विराटने जेव्हा संघाची धुरा हाती घेतली, तेव्हा परिस्थिती काही खास नव्हती. त्यानंतर विराटने खेळण्याची पद्धत पूर्ण बदलून टाकली आणि संघाच्या गोलंदाजीवर विशेष लक्ष केंद्रित केले. त्यासोबतच कोहलीने स्वतःही फलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आणि संघाचे नेतृत्व पुढे राहून केले. विराटच्या कर्णधारपदात 5 गोलंदाज खेळवण्याची पद्धत सुरू झाली. तो 68 टेस्ट सामन्यांमध्ये कर्णधार राहिला आणि फक्त 16 सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. त्याचा विजयाचा टक्का 58.82 इतका राहिला.
विराट कोहलीच्या पदार्पणाला आज 17 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि या काळात तो 14 आयसीसी स्पर्धांचा भाग राहिला आहे. या काळात कोहली टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. एकदिवसीय आणि टी20 वर्ल्ड कपसोबतच चॅम्पियन्स ट्रॉफीतही त्याने आपले कौशल्य दाखवून दिले आहे. या तिन्ही स्पर्धांमध्ये मिळून त्याने तब्बल 3834 धावा केल्या आहेत.
विराटच्या पदार्पणानंतर टीम इंडियाने 4 आयसीसी ट्रॉफ्या जिंकल्या असून अनेक वेळा अंतिम आणि उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे.
विराट कोहलीने 2012 मधील खराब आयपीएल हंगामानंतर आपल्या फिटनेसमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. त्याला आरोग्याचे महत्त्व समजले आणि त्याने आपल्या आहार व ट्रेनिंग पद्धतीत बदल केले. फिट झाल्यानंतर कोहलीने धावा घेण्याचा वेग खूप वाढवला आणि फिल्डिंगमध्येही नवे मानदंड निर्माण केले. यानंतर टीम इंडियामध्येही फिटनेसला मोठे महत्त्व मिळाले आणि आजच्या घडीला सर्व खेळाडू स्वतःला उत्तम तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात.






