श्रीलंकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर (Sri Lanka Tour Of India) असून उभय संघांमध्ये नुकतीच टी२० मालिका पार पडली आहे. या मालिकेत पाहुण्या श्रीलंकेला मानहानिकारक पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर उभय संघ ४ मार्च ते १६ मार्च दरम्यान २ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी (Test Series) आमने सामने येणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना मोहाली (Mohali Test) येथे होणार असून हा सामना भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यासाठी अतिशय खास असणार आहे.
विराटचा हा कसोटी कारकिर्दीतील १०० वा (Virat Kohli’s 100th Test) सामना असेल. तर रोहित या सामन्यातून प्रथमच कसोटी संघाचा कर्णधार (Rohit Sharma’s First Test As Captain) म्हणून जबाबदारी सांभाळेल. याच सामन्यात एक कहर योगायोगही पाहायला मिळेल. भारताच्या कसोटी संघाचा माजी कर्णधार विराटने स्वदेशात पहिल्यांदा कसोटी संघाचे नेतृत्त्व मोहाली (Mohali Stadium)मध्येच केले होते. यानंतर आता त्याची जागा घेणारा नवा कर्णधार रोहितही मोहालीतूनच कसोटी संघाची कमान सांभाळेल.
भारतातील पहिल्याच कसोटीत कर्णधार विराट झाला होता फ्लॉप
विराटने २०१४ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसरकर मालिकेत कर्णधार म्हणून पहिला कसोटी सामना खेळला होता. ऍडलेड येथे झालेल्या या सामन्यातील दोन्ही डावात विराटने शतक झळकावले होते. परंतु तो संघाला हा सामना जिंकून देऊ शकला नव्हता. भारताने तो सामना ४८ धावांनी गमावला होता.
मात्र भारतात कसोटी कर्णधार म्हणून विराटचे पदार्पण निराशाजनक राहिले होते. तो या सामन्यातील दोन्ही डावात चांगले फलंदाजी प्रदर्शन करू शकला नव्हता. परंतु रोहित कसोटी कर्णधार म्हणून त्याच्या पहिल्या सामन्यात विराटच्या प्रदर्शनाची पुनरावृत्ती न करण्यासाठी प्रयत्नशील असेल.
कसोटी कर्णधार म्हणून पहिलीच मालिका जिंकण्याचे रोहितपुढे असेल आव्हान
श्रीलंकेविरुद्ध मोहाली कसोटी सामन्यातून रोहित कसोटी संघाची सुत्रे हाती घेईल. त्यामुळे मर्यादित षटकांच्या क्रिकेटप्रमाणे कसोटी क्रिकेटमध्येही अजेय राहण्याचे आव्हान रोहितपुढे असेल. रोहितने भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून जबाबदारी स्विकारल्यानंतर सर्व मालिका जिंकल्या आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेपासून रोहितने ही जबाबदारी सांभाळली होती. त्याने वेस्ट इंडिजला वनडे आणि टी२० मालिकेत ३-० ने क्लिन स्वीप केले आहे. त्यानंतरची श्रीलंकेविरुद्धची ३ सामन्यांची टी२० मालिकाही त्याने ३-० ने जिंकली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीसीआय फिजिओ आणि ट्रेनर्सची नवी टीम बनवण्याच्या तयारीत, अनफिट क्रिकेटर्स निशाण्यावर!