पुढील महिन्यात श्रीलंकेमध्ये भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश संघात टी २०ची तिरंगी मालिका रंगणार आहे. पण या मालिकेसाठी भारतातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघातील अनेक खेळाडू सातत्याने खेळत आहेत. त्यामुळेच ही विश्रांती देण्याची शक्यता आहे. यात भारताचा कर्णधार विराट कोहली, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह या तीन खेळाडूंना विश्रांती मिळण्याची दाट शक्यता आहे.
पण त्याचबरोबर विराटला विश्रांती हवी आहे की नाही याबद्दल तो स्वतः निर्णय घेईल असे बीसीसीआयचे पदाधिकारी पीटीआयशी बोलताना म्हणाले, ” जर विराटला विश्रांती हवी असेल तर त्याला ती मिळेल. विराटच्या बाबतीत तो स्वतःच ठरवेल त्याला खेळायचे आहे की नाही. माहित नाही त्याला कदाचित ही तिरंगी टी २० मालिका खेळायची असेलही. कारण ही मालिका यावर्षीच्या मोसमातील शेवटची मालिका असणार आहे. त्यानंतर ही मालिका संपली की विराटला आयपीएलच्या आधी १५ दिवस सुट्टीच मिळणार आहे.”
निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी मात्र याबद्दल काही सांगितले नाही. या आठवड्याच्या शेवटी श्रीलंकेत होणाऱ्या टी २० तिरंगी मालिकेसाठी भारताची संघ निवड होणार आहे.
तसेच बुमराह आणि भुवनेश्वर दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात सातत्याने खेळत आहेत. त्यामुळे आयपीएल चालू होण्याआधी त्यांनाही आराम देऊ शकतात. भुवनेश्वरने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात जवळ जवळ १०० पेक्षा जास्त षटके गोलंदाजी केली आहे.
त्याच बरोबर या दौऱ्यात सर्वात जास्त गोलंदाजी केली ती बुमराहने. बुमराह हार्दिक पंड्या आणि विराटप्रमाणे भारताच्या प्रत्येक सामन्यात खेळला आहे. त्याने या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात १५० पेक्षा जास्त षटके टाकली आहेत.
यामुळेच पुढच्या मोसमातील सामने लक्षात घेता भुवनेश्वर आणि बुमराहला विश्रांती मिळेल. पुढील मोसमात भारतीय संघ एकूण ६३ आंतराष्ट्रीय सामने खेळणार आहे. यात ३० वनडे सामन्यांचा समावेश आहे.
जर भूवनेश्वर आणि बुमराहला विश्रांती दिली तर जयदेव उनाडकट आणि शार्दूल ठाकुरवर नवीन बॉल हाताळण्याची जबाबदारी येऊ शकते. तसेच केरळच्या बेसिल थंपीला देखील संधी मिळण्याची शक्यता आहे.