चेन्नई। शुक्रवारी (९ एप्रिल) विराट कोहली कर्णधार असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाच्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का दिला. बेंगलोरने हा अटीतटीचा सामना अखेरच्या चेंडूवर जिंकला. या विजयाबरोबरच हा सामना विराटसाठी खास ठरला. या सामन्यादरम्यान फलंदाजी करताना त्याने खास विक्रम केला.
या सामन्यात मुंबईने बेंगलोरला १६० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी विराट वॉशिंग्टन सुंदरसह सलामीला फलंदाजीसाठी उतरला होता. पण सुंदर १० धावांवर आणि पाठोपाठ रजत पाटिदार ८ धावांवर बाद झाले. पण विराटने ग्लेन मॅक्सवेलला साथीला घेत बेंगलोरच्या विजयाचा पाया रचला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली. मात्र, जसप्रीत बुमराहने विराटला ३३ धावांवर बाद केले.
तरी या खेळी दरम्याने विराटने टी२० क्रिकेट प्रकारात कर्णधार म्हणून ६००० धावा पूर्ण करण्याचा कारनामा केला. हा कारनामा करणारा तो जगातील पहिलाच कर्णधार ठरला आहे. यापूर्वी कोणालाही कर्णधार म्हणून टी२० क्रिकेटप्रकारात ६००० धावा करता आल्या नव्हत्या. विराटने कर्णधार म्हणून १६८ वा टी२० सामना खेळताना हा कारनामा केला आहे.
टी२० क्रिकेट प्रकारात सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधारांमध्ये विराटच्या पाठोपाठ भारताचाच माजी कर्णधार एमएस धोनी आहे. त्याने कर्णधार म्हणून २५२ टी२० सामने खेळताना ५८७२ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे टी२० क्रिकेट प्रकारात कर्णधार म्हणून ५००० धावांचा टप्पा पार करणारे विराट आणि धोनी हे दोनच क्रिकेटपटू आहेत.
टी२० क्रिकेट प्रकारात सर्वाधिक धावा करणारे कर्णधार –
६०००* धावा – विराट कोहली (१६८ सामने)
५८७२ धावा – एमएस धोनी (२५२ सामने)
४२४२ धावा – गौतम गंभीर (१६६ सामने)
४०५१ धावा – ऍरॉन फिंच (१२६ सामने)
३९२९ धावा – रोहित शर्मा (१४० सामने)
आंतरराष्ट्रीय टी२०मध्येही विराटचाच बोलबाला
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्येही विराट सर्वाधिक धावा करणारा कर्णधार आहे. त्याने ४५ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत भारताचे नेतृत्व करताना ४८.४५ च्या सरासरीने १५०२ धावा केल्या आहेत.
बेंगलोरने जिंकला सामना
आयपीएल २०२१ च्या पहिल्या सामन्यांत मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांअखेर १५९ धावा केल्या होत्या. या डावात मुंबई इंडियन्स संघाकडून रोहित शर्माने १९ तर ख्रिस लिनने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. तसेच सूर्यकुमार यादवने ३१ धावा केल्या. यासोबतच ईशान किशनने २८ धावा केल्या. बेंगलोरकडून हर्षल पटेलने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.
प्रतिउत्तरादाखल फलंदाजीसाठी उतरलेल्या बेंगलोरने १६० धावांचे आव्हान शेवटच्या चेंडूवर पूर्ण करत हा सामना जिंकला. बेंगलोरकडून एबी डिविलियर्सने सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली. तसेच ग्लेन मॅक्सवेलने ३९ आणि विराट कोहलीने ३३ धावांची खेळी केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि मार्को जेन्सनने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या
महत्त्वाच्या बातम्या –






