पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला १८ ते २२ जून दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. तसेच त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्यामुळे एकूण ६ कसोटी सामने या दौऱ्यात भारतीय संघ खेळताना दिसेल. या सामन्यांमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीला काही खास विक्रम करण्याची संधी आहे.
सर्वाधिक सामन्यात नेतृत्त्व करणारा कर्णधार
विराटने आत्तापर्यंत भारताचे ६० कसोटी सामन्यात नेतृत्व केले आहे. त्यामुळे सध्या भारताकडून सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत तो आणि माजी कर्णधार एमएस धोनी संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहे. धोनीनेही ६० कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. पण कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मैदानात कर्णधार म्हणून उतरताच विराट धोनीला या यादीत मागे टाकेल. हा अंतिम सामना विराटचा कर्णधार म्हणून ६१ वा कसोटी सामना असेल.
सर्वाधिक विजय मिळवण्याच्या यादीत क्लाईव्ह लॉईडला मागे टाकण्याची संधी
विराट सध्या भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने ६० कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व करताना ३६ सामन्यात विजय मिळवले आहेत. कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्या भारतीय कर्णधारांमध्ये तो अव्वल क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर २७ विजयांसह एमएस धोनी आहे.
जागतिक क्रिकेटचा विचार करायचा झाल्यास कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याच्या यादीत विराट क्लाईव्ह लॉईड यांच्यासह संयुक्तरित्या चौथ्या क्रमांकावर आहे. लॉईड यांनीही कर्णधार म्हणून ३६ सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारताने या इंग्लंड दौऱ्यात एकाही सामन्यात विजय मिळवला तरी विराट या यादीत लॉईड यांना मागे टाकेल. सध्या या यादीत अव्वल क्रमांकावर ग्रॅमी स्मिथ असून त्याने ५३ सामने जिंकले आहेत. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे ४८ आणि ४१ विजयांसह रिकी पाँटिंग आणि स्टिव्ह वॉ आहेत.
कसोटी अजिंक्यपद जिंकणारा पहिला कर्णधार होण्याची संधी
विराट गेले ७ वर्षे भारताच्या कसोटी संघाचे नियमितपणे नेतृत्व करत आहे. तर सर्वप्रकारात गेले ४ वर्षापासून तो नियमित कर्णधार आहे. पण अजून विराटला आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. असे असले तरी आता विराटला कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकून मोठा पराक्रम करता येणार आहे. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच कसोटी अजिंक्यपद स्पर्धा खेळवण्यात येत आहे. त्यामुळे विराटला ही स्पर्धा जिंकणारा पहिला कर्णधार ठरु शकतो. पण त्याला केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडचे मोठे आव्हान असणार आहे. विलियम्सनही ही स्पर्धा जिंकून कर्णधार म्हणून पहिली आयसीसी स्पर्धा जिंकण्याच्या प्रयत्नात असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
फिरकीपटू चहलचे मोठे विधान; म्हणाला, ‘आयपीएल स्थगित झाली नसती तरीही सोडून जाणारचं होतो’
कसोटी चॅम्पियनशीप फायनलपुर्वी न्यूझीलंडचा ‘हा’ क्रिकेटपटू चढला बोहल्यावर, शेअर केला लग्नाचा फोटो